Wednesday, December 15, 2010

संपली माझी गोष्ट

एकदा अशाच एका संस्कारवर्गात प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते .काय मजा आली म्हणून सांगू !सगळी बालप्रजा ही आदल्या वर्षी बाल गटात वय बसत नसल्याने शाळांनी नाकारलेली आणि संस्कार वर्गाने संस्कार करण्यासाठी आनंदाने स्वीकारलेली होती .लहानमुले मला जरा जास्तच आवडत असल्याने प्रमुख पाहुणी पेक्षा त्यांच्या हालचाली निवांत पणे न्याहाळाव्यात म्हणून जरा आधीच जाऊन बसले .वर्गाचे दार बंद होते .संचालिका यायच्या होत्या .मी तिथेच एका झाडाजवळ बसले.

मला संचालीकेशिवाय कोणीच व्यक्तीशः ओळखत नसल्याने मी निवांत पणे बालगोपाळ पाहू लागले .कुणी सॉक्सशी चाळे करत होता .कुणी खिशातून आणलेले पिक्सो ,बारक्या गाड्या मित्रांना दाखवत होता .इवल्याशा चिमण्या मस्त चिवचिवत होत्या .आलेले पालक आपापल्या बाळांना आवरायचा शिस्त लावायचा प्रयत्न करत होते .ही बाळं त्यांच्या भोवती ही धुडगूस घालत होती .तेवढ्यात बाई आल्या आणि मुलं एकदम चिडीचूप झाली ...आता मात्र संस्कार धो धो वाहायला लागले .

बाईनी माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर मुलांचे विविध गुण दर्शन सुरु झाले .हे गुणदर्शन म्हणजे उपस्थित पालकांना वर्षभरात आपला मुलगा किती गुणवान झाला आणि शिक्षकांना याची देही याची डोळा आपण पेरलेले संस्कार उगवताना ,फोफावताना बघण्याची संधी !

बाई म्हणाल्या ,"चला बरं गोष्ट कोण सांगणार ? आपण कितीतरी गोष्टी शिकलोय कि नाही ? अदिती, अथर्व ,ख़ुशी कोण येतं बरं गोष्ट सांगायला ?चल चिन्मय,तू सांग बरं गोष्ट !"

चिन्मय कसाबसा उठला ...उठला कसला ! त्याच्या आईने त्याला ढकललाच ..चिन्मय नावाची ही अडीच पावणेतीन फुटी मूर्ती ! पिवळा आडव्या रेघांचा टी शर्ट, हिरवी इलास्टिक ची चड्डी पोटावर गच्च बसलेली ,त्यातही कडक इन शर्ट केला होता साहेबांनी ! उठताना अडखळत उठला पण नंतर सावरून आमच्या बाजूला उभा राहीला .हाताची घडी घालून विवेकानंदांची पोज घेतली .सगळीकडे नजर फिरवली आणि गोष्ट सांगू लागला ....

" उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या .एकीचे नाव सुनीती आणि दुसरीचे नाव सुरुची .सुनीती चांगली होती ,दयाळू होती.सुरुची दुष्ट होती ...पण पट्टराणी होती ना ssssssss! ( हा ना जरा जास्तच लांब होता ) एकदा काय झालं !(बालप्रजेच्या डोळ्यात उत्कंठा तुडुंब भरली होती ) सुनितीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम राजा उत्तानपाद च्या मांडीवर बसले होते .तेवढ्यात सुरुची तिथे आली आणि तिनं ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ओढून लांब ढकललं आणि ओरडली ,"तू राजाच्या मांडीवर आज्जिबात बसायचं नाही .तिथंफक्त माझा उत्तम बसणार !".सगळी चिमणी प्रजा गोष्ट मन लाऊन ऐकत होती. निवेदनाप्रमाणे चेहऱ्यावरचे भावही बदलत होते

" राजाला खूप वाईट वाटलं... ध्रुव त्याचा मुलगा होता ना!...पण काय करणार ? सुरुची पट्टराणी हो ना ssss ! " चिन्मयची आई च्या डोळ्यात लेकाचे कौतुक मावत नव्हते.कदाचित लेक गुणवत्ता यादीत आल्याचे एखादे सुप्त स्वप्न ही पाहत असावी बिचारी !चिन्मयची कथा धोधो वाहत होती

"ध्रुव रडत रडत आईकडे गेला ...आणि मग त्यानं काय केलं एक कावड घेतली आणि आपल्या आईबाबांना तिच्यात बसवलं आणि तो काशी यात्रेला निघाला ." स्टोरी ने अब बढिया टर्न लिया .आई टीचर अस्वस्थ झाल्या ...बाकीचे पालक खुदुखुदू हसू लागले .पण बालप्रजेची उत्सुकता कायम होती .टीचर चिन्मयची चड्डी ओढू लागली .पण मी थांबवलं त्यानं .बाकीच्या मुलांच्या सोबत मलाही ही नवी गोष्ट ऐकायची होती ना !...त्याला निवांत पणे मी गोष्ट सांगू दिली ....

"कावड मध्ये बसलेले आईबाबा त्याला म्हणाले ,बाळ आम्हाला पाणी देशील का रे ..तो हो बाबा म्हणाला ...मुलानो तुमच्या आईबाबांनी तुमच्याकडे पाणी मागितलंतर तुम्हीही हो म्हणायचं .आणि तांब्यात पाणी भरून भांडं आणायचं म्हणजे पाणी वाया जात नाही " टीचरने सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी बाहेर पडत होती .मुलांनी लांबलचक होकारार्थी मन हलवली .

" तो तांब्या घेऊन नदीकडे गेला .त्यानं तांब्या पाण्यात बुडवला.डूब डूब असा आवाज आला .तेवढ्यात पलीकडून सुssssई करत बाण आला आणि त्याच्या पोटात घुसला " बाण पोटात घुसल्याची खात्री झाल्यावर चिन्मय गोष्ट पुढे नेऊ लागला ....

" आई ग ss! तो ओरडलेले पाहून राजा दशरथ आला आणि त्याला पडलेले पाहून रडू लागला ,"अरेरे हे मी काय केले रे बाळ!" रडू नका महाराज तिकडे माझे आई वडील आहेत त्यानं पाणी द्या ! एवढे म्हणून तो मेला ." ही नवी गोष्ट सर्व बालप्रजा मन लाऊन लक्ष देऊन ऐकत होती .चिन्मयची आई मात्र अस्वस्थ झाली .मला त्याचा आवेश खूप आवडला होता आणि बालप्रजेला वेगळी नवी गोष्ट !

"राजा दशरथ पाण्याचा तांब्या घेऊन आईबाबांच्या कडे गेला .बाबांनी रागाने त्याला विचारले , कुठे आहे तुझा देव ? तो नम्रपणे म्हणाला ,बाबा तो सगळी कडे आहे ..! बाबांनी रागाने विचारले .त्या भिंतीत आहे ? या खांबात आहे ?"

एक प्रचंड खसखस पालकात पसरली .मलाही हसू आवरेना टीचर आणि चिन्मयची आई हसण्याचा प्रयत्न करत होत्या .टीचरने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी एका दमात सांगत होता बिचारा !

आलेल्या व्यत्ययाने बारकी मुलं नाराज झाली .एवढ्या सॉलिड गोष्टीला खुळ्यासारखे हसतात काय ? हाच भाव त्यांच्या डोळ्यात होता .ही नवीन गोष्ट त्याना भलतीच आवडली होती ..मला पण हं! चिन्मयने हातवारे करत मोठ्यांना शांत बसवले आणि गोष्ट सांगू लागला पण तेवढ्यात त्याची नजर आईच्या डोळ्यांकडे गेली आणि गोष्ट राजधानी एक्प्रेस ने पुढे सरकली ." त्याच्या बाबांनी खांबाला जोरात लाथ मारली.नरसिंह आला त्याने बाबांना आपल्या मांडीवर झोपवले ..आणि पोट फाडले ..आणि दुष्ट राजा मेला ...आणि संपली माझी गोष्ट !" म्हणत चिन्मय महर्षी मला आणि टीचरला नमस्कार करून जागेवर विराजमान झाले .

दुष्ट राणी पासून सुरु झालेली गोष्ट दुष्ट राजा मेल्यावर संपली .माझा दिवस सत्कारणी लागला .गोष्टींचं मस्त कोलाज पाहिलं नंतर भाषणात मी त्याच्या उत्स्फूर्त पणाचे,सभाधीटपणाचे कौतुक केले.आता घरी वर्गात नवीन गोष्ट सुरु होणार हेही लक्षात आले जरी चिन्मय म्हणाला असेल 'संपली माझी गोष्ट !

स्वाती ठकार( हा लेख 24-09-2007 च्या सकाळच्या मुक्तपीठ मध्ये प्रकाशित )

खरच संपली का गोष्ट !!!


1 comment:

  1. स्वाती नक्षत्रात शिंपल्यात मोती होतात पण त्याहून मौल्यवान मोती कागदावर होतात हे आश्चर्य पहिल्यांदाच पहिले. घडवलेल्या शब्द्साक्षात्काराबद्दल हार्दिक धन्यवाद.

    ReplyDelete