Saturday, November 21, 2020

सृजन वेणा... मरण यातना

 सृजन वेणा… मरण यातना


दरवर्षीच्या प्रथेप्रमाणं चिंतन आदेश पाक्षिकाच्या दिवाळी अंकाचा या वर्षीचा विषय ठरला मृत्यू. शब्द तसा नवा नाही. तरीही तो लांबच बरा असं वाटणारा. सहज मनात विचार आला मृत्यू म्हटलं की फक्त देहाचा मृत्यूच डोळ्यासमोर येतो पण भाषेचा मृत्यू, नात्याचा मृत्यू, माणूसकीचा मृत्यू, सौजन्याचा- सहनशक्तीचा अंत, भावनेचं मरणं, लाजेनं मरणं असे अनेक शब्दप्रयोग दैनंदिन वापरात आढळून येतात. मृत्यूचं मूर्त, अमूर्त रूप लेखक, कवी, चित्रकारानी आपल्या रचनेत क्षमता, प्रतिभेनुसार चित्रित केलं आहे. पण त्यांच्यातील रचनाकाराचं मरणं ही विचार करण्याजोगं आहे . 


मौत तू एक कविता है म्हणणारे गुलजार असोत किंवा मातीवर चढणे एक नवा थर अंती म्हणणारे कुसुमाग्रज असोत मांडलेला तरलपणा आणि कठोर सत्य नाकारता येत नाही. इतुक्या लवकर येई न मरणा ।मज अनभवुंदे या सुखद क्षणा।। म्हणणारे बाकीबाब मृत्यूच्या भयानं झुरायचं कशाला हे सांगताना म्हणतात, एक दिवस केव्हा तरी हो असे मरायचे। म्हणून काय त्याच भयाने रोज जगायचे।। म्हणत समजूत घालतानाच आयुष्याची आता। झाली उजवण।येतो तो तो श्रण। अमृताचा असं सांगतात. आणि तसंच समुद्राचं सुंदर वर्णन करणारी आपली कविता सुनिताबाईंकडून ऐकत ऐकत कोमात जाताना मरणालाही त्याचं दिमाखात सामोरे जातात. मृत्यूचे अनेक रंग काव्यातून कवी शायरानी मांडले आहेत. या जीवनाचा चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा हे माहीत आहे तरीही माणसाची जगण्याची आसक्ती कमी होतच नाही.


हे मरणरंग आपल्या साहित्यात विखुरणाऱ्या रचनाकारांचा मृत्यू हा माझ्यासाठी चिंतनाचा विषय आहे. हिंदी साहित्यिक देवेंद्र इस्सर गेले ही बातमी आली. शेवटच्या काळात एकांतवासात असलेले हे लेखक. काळजी घेणारं कुणीच नव्हतं जवळ.कधी कधी लेखक मरण्याच्या आधी त्याच्यातील रचनाकार मरत जातो आणि त्याला कळतही नाही . अशीच बातमी कथाकार लवलीन गेल्याची आली. लवलीन ही शिस्तप्रिय वडील आणि तरल मनाची भाषेची प्राध्यापक आई यांचं अपत्य.लवलीन स्वतः एक प्रेमळ आई, यशस्वी पत्नीही. विसंगत व्यक्तिमत्वाच्या आईवडिलांच्या सानिध्यात वाढलेली ही बंडखोर लेखिका. धर्मयुगमधे हिची एक कथा छापून आली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली. सुरुवातीलाच उत्कृष्ट साहित्य दिल्यानंतर स्वतःशीच स्पर्धा सुरू होते.उत्तम रचनेसाठी संघर्ष सुरू होतो.असाच संघर्ष हिचाही सुरू झाला. पर्यायाने सिगरेट, दारू, डिप्रेशनची रूग्ण झाली .वरवर पाहता हिचं मरण या दारू सिगरेट डिप्रेशन मुळं वाटतं. पण खोलात गेल्यावर लक्षात येतं प्रत्येक रचनाकार सामान्य आणि मानसिक असंतुलनाच्या सीमारेषेवरून चालत असतो. याचं मुख्य कारण त्याच्यात रचनात्मक मानसिक संघर्ष आणि विलक्षण तणाव असतो. यामुळं मानसिक असंतुलन ,डिप्रेशन, मायग्रेन अशा व्याधी येतात. कमी अधिक प्रमाणात सगळे सर्जनशील रचनाकार या स्थितीतून जात असतात. जे रचनाकार स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने विसंगत कल्पना संसार उभा करतात. खास करून तरल, भावनीक, आवेगपूर्ण पद्धतीनं आपल्या रचनेत गुंतत जातात त्यांचा बाह्य आणि अंतर्मनात संघर्ष सुरू होतो . मेंदू थकत जातो. निद्रानाश आणि अनेक आजार घेरतात. बऱ्याचदा अशा स्थितीत विचार आणि कृतीत विसंगती दिसू लागते. एकाच दृष्यावर मन स्थिर होत नाही.समोर बसून एक कृती करत असताना आपल्या रचनेचेच विचार मनात फिरत असतात. पर्यायाने विक्षिप्तपणा वाढतो. अशावेळी इलेक्ट्रिक स्वीचप्रमाणे लेखकानेही ऑन –ऑफ टेक्निक शिकलं पाहिजे असं वाटतं. अन्यथा ज्याप्रमाणे गाडी सतत फर्स्ट गियरमधेच चालवल्याने जसं इंजिन गरम होऊन गाडी बिघडते तसंच माणसाच्या शरीराचंही होतं.रचना प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या अशाच अनुभवाची पुष्टी हिंदी लेखक प्रियंवदने दिली आहे. हा विषय नेमकेपणानं मांडताना प्रियंवदच्या त्या ब्लॉगची मला मोलाची मदत होत आहे.


कधी कधी आपले सर्वोत्तम साहित्य दिल्यानंतर एक रिक्तता निर्माण होते. स्वदेश दीपक यांची मैंने मांडू नहीं देखा ही कलाकृती भाषा आणि सशक्त आशयाचा उत्तम नमुना. समीक्षक या भाषेची तुलना नीत्शेच्या भाषेशी करतात. या अप्रतिम कलाकृतीनंतर ते फिरायला म्हणून बाहेर पडले ते परत आलेच नाहीत .काहीच ठावठिकाणा नाही. आजतागायत कुणालाच दिसलेले नाहीत.शोध सुरूच आहे.


अनेकदा अतिशय उत्कृष्ट रचनाकारही साहित्य जगताच्या राजकारणाचा, कंपूशाहीचा बळी ठरतो. अनुल्लेखाने मारला जातो . याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी साहित्यिक शैलेश मटियानी. निव्वळ लेखक होण्याचीच दुर्दम्य इच्छा असलेल्या शैलेश मटियानींचा जीवन संघर्ष अवाक करून सोडतो .त्यांची दो दुखों का एक सुख ही कथा प्रेमचंद यांच्या रचनेच्या तोडीस तोड मानली जाते. त्यांची अर्धांगिनी ही कथा दांपत्य जीवनाच्या प्रेमावर लिहिलेली एकमेव हिंदी कथा. कथेची भाषा, त्यातली तरलता यामुळे ही कथा वारंवार वाचली जाते. चंदा गोळा करून ते मासिक काढत. प्रस्थापितांच्या टोळीने राजकारण करून बदनाम केल्यानंतर धर्मयुग सारखा गडगंज पेपर आणि धर्मवीर भारतीं विरुद्ध कोर्टात मटियानी खटला लढले. जवळ पैसा नसल्यामुळे वकिला ऐवजी स्वतः युक्तीवाद करून शेवटपर्यंत लढले.दोन वेगळ्या आर्थिक स्तरावरचा तो खटला होता. साहजिकच हरले .पण त्या दरम्यान कायद्यातील तृटी, पळवाटा शोधणारे अनेक अप्रतिम लेख त्यानी लिहिले. या कायदेशीर लढाईचा शरीरावर खूप वाईट परिणाम झाला .त्यातच ते आयआयटी कानपूरमधे असताना त्यांच्या मुलाच्या हत्येची बातमी त्याना मिळाली. ते मानसिक तणावाने ग्रस्त झाले. उपचारानंतर जरा बरे होताच अकार च्या प्रवेशांकासाठी अप्रतिम दीर्घकथा नदी किनारे का गाव लिहिली. आणि तिथूनच तीव्र मानसिक आजार सुरू झाला .त्यातच ते गेले.गिरीराज किशोर सांगत कि शेवटी शेवटी तर शैलेश मटियानी इतके उत्तेजित होत होते कि मृत्युच्या दोन दिवस आधी ते भेटायला गेले असता मटियानीना कॉटला साखळीनं बांधून ठेवलं होतं.


अलिकडेच मराठीत शोध ही सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिणारे मुरली खैरनार हे सर्जनशील लेखक. काळाचा एक विशाल पट कवेत घेणारी, संदर्भांचा प्रचंड धांडोळा घेणारी ही सुंदर कादंबरी. कल्पना आणि वास्तव याची अफलातून सरमिसळ या रचनेत आहे .शैली आशय मांडणीच्या दृष्टीने अप्रतिम कलाकृती. नैतिकता ,मूल्यं या विषयी ठाम मतं असलेले मुरली खैरनार पुरस्कार परतीच्यावेळी मराठी लेखक मंडळींच्या पाठी ठाम उभे राहिले. ते लेखनादरम्यान फेसबुकवर अत्यंत सक्रीय होते. संवादही होत होता. नंतर संवाद थांबला . कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दूसरी आवृत्तीही लगेच आली. ते आजारी असल्याचे कळाले. तीव्र डोकेदुखीने ग्रस्त असल्याचे समजले. पॅरॅलिसीसचा अटॅक आल्याचेही कळाले आणि एक दिवस ते गेल्याची दुर्दैवी बातमीही आली.


रचनाकाराचा मृत्यू, त्याच्यातील रचनाकार मरत गेल्याने, सृजनाचा दुष्काळ पडल्यानेही होतो. आणि जेव्हा रचनाकाराला आपल्यातील रचनाकार संपतो आहे ही जाणीव होते तेव्हा आपल्या मरणाचीही चाहुल त्याला लागते. हा रचनाकार एकाएकी संपत नाही . हळूहळू क्षीण होत जातो. अनेक अतर्बाह्य कारणांमुळे हे घडते . निर्मल वर्मांची सूखा ही हिंदी दीर्घ कथा मला वाटतं हा विषय नेमकेपणानं मांडणारी साहित्यविश्वातील एकमेव कथा. हेमिंग्वेने आत्महत्या केली कारण आपल्यातील रचनाकार संपत चाललाय हे त्यानं जाणलं आणि त्याचा स्वीकार करणं त्याला असह्य झालं. 1952 मधे ओल्ड मॅन अँड अ सी नंतर 1961 च्या मृत्यूपर्यंत काही खास लिहू न शकल्याचं शल्य सतत बोचत राहिलं .मृत्यूपूर्वी इ ए. हाशनर या मित्राबरोबर बोलताना त्याने आपल्या आत्महत्येचा विचार बोलून दाखवला आणि त्याच्या पुष्टीसाठी तो म्हणाला बासस्ठ वर्षाच्या माणसाला जेव्हा स्वतःशी संकल्प केल्याप्रमाणे कादंबरी कथा न लिहू शकल्याचं जाणवतं तेव्हा त्यानं काय करावं .? मित्राने सल्ला दिला . काही काळ लेखन बाजूला ठेव .त्यावर हेमिंग्वेनं जे उत्तर दिलं ते विचार करायला लावतं. तो म्हणतो, मला जेव्हा विश्वास असतो कि मी लिहू शकेन तेव्हा मी एक वर्ष थांबलो काय किंवा दहा वर्षं न लिहिता राहिलो काय फरक पडत नाही .पण मी लिहू शकत नाही ही भावना सतत सोबत बाळगत जगण मरणप्राय आहे.


वर्जिनिया वुल्फ ,सिल्विया प्लॉथ यांच्या आत्महत्या थरकाप उडवतात. गुगलवर शोधल्यास आत्महत्या करणाऱ्या रचनाकारांची भली मोठी यादी दिसेल.मेमरीज ऑफ माय मेलन्कनी होर्स (माझ्या उदास वेश्यांच्या आठवणी )लिहिताना मार्क्वेज आपल्या सृजनाच्या वाळत चाललेल्या मुळांशी झटतानाच दिसतो. मी आजपर्यंत लिहिलेलं सर्व व्यर्थ आहे या भावनेनं ग्रासलेल्या फ्राँज काफ्कानं तर आपलं एकुण एक लिखाण जाळण्याचा संकल्प केला. बरंचसं स्वतःच्या डोळ्यासमोर जाळायला लावलं.मराठी साहित्यात समीक्षा,काव्य, कथा प्रांतात मानदंड असणारे सानेगुरूजी का बरं जगण्याला कंटाळले असतील? हा प्रश्न खरंच जीवघेणा आहे. रचनाकारात ठाण मांडून बसणारा विषाद हा शोधाचा विषय आहे . का बरं येते ही अशी खिन्नता? अनेकदा अमूर्त भावबोध होतो पण व्यक्त होण्यासाठी शब्दानाच शरण जावं लागतं. ते कधी कधी वश होत नाहीत. जसं की ,


चालता बोलता जगण्याच्या प्रवासात


खूप काही सुंदर भव्य अद्वितीय 


मनाला भावणारं दिसतं .


सलणारं टोचणारं असतं काही 


काही मनस्वीपणे भोगलं जातं 


आतून अनुभवलं जातं 


सगळंच शैलीत अचूक पकडता येत नाही 


सगळं जसंच्या तसं मांडताही येत नाही 


बऱ्याचदा त्याला अव्यक्तच सोडून द्यावं लागतं 


एक हूरहूर वाटते .


परंतू जे व्यक्त होतं 


त्याचंही पूर्ण समाधान मिळत नाही 


ते मूर्त झाल्यावर काहीतरी गमावल्याचं जाणवत राहतं


आणि विलक्षण खिन्नता येते 


का बरं सुकत जातो रचनाकार आतल्या आत? खरं तर रानातील पिकांच्या दुष्काळाची जी कारणे आहेत तीच इथेही लागू होतात.1)खत पाणी न मिळणं म्हणजे संवेदना, सहानुभूती, विचारशीलता ,विवेकबुद्धी संपणं 2) कीड लागणं म्हणजे सृजनक्षमता ,वेळ आणि शक्ती अन्य अनावश्यक किंवा उपद्रवी विषयांकडे वळणे.3) हवापाणी न मिळणं म्हणजे अभ्यास थांबणं ज्ञानाच्या अन्य स्रोतांशी संपर्क तुटणं 4) कटाई छटाई न होता अंधाधुंद वाढ होणे म्हणजेच वाईट सुमार रचनेचंही वारेमाप कौतुक होणं. 


शांत श्वासोच्छवास आणि धीमी चाल लेखकाची नाडी असायला हवी.अन्यथा पाण्याच्या बुडबुडबुड्या प्रमाणं लगेच फूटून जाईल. शेअर बाजारात जसे लांब पल्याचे शेअर असतात तसेच झटपट वर जाणारे आणि तितक्याच झटपट कोसळणारे शेअर असतात तसंच हे ही क्षेत्र. जो स्वतःतच आत्ममुग्ध होऊन रमला त्या रचनाकाराचा मृत्यू हॅमलीनच्या बासरी वाल्याच्या मागे नाचत गात जाऊन पाण्यात बुडून मरणाऱ्या उंदराप्रमाणे सर्वात दयनीय मृत्यू असतो.


अनेक शासकीय साहित्य संस्था, स्वघोषीत साहित्यप्रेमी संस्था, साहित्याचे ठेकेदार नवी क्रांती करण्यासाठी नवोदितांना व्यासपीठ देण्याची घोषणा करण्यासाठी हिरीरीने पुढे येतात. अनेक नवीन रचनाकार घडवल्याचा दावा करतात. मागोवा घेतल्यास ही यादी बोटावर मोजण्याइतकी असते. पण या खटाटोपात सृजन संपलेल्या रचनाकारांची संख्या अगणित असते. एकच रचना वर्षानुवर्ष व्यासपीठावर सादर होते तेव्हा रचनाकाराचं सृजन संपलं की काय असं वाटू लागतं. 


नवीन रचनाकाराला मारण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्याच्या सर्वात कमजोर रचनेचं वारेमाप आणि वारंवार कौतुक करणं. स्वतःवरच्या प्रेमात आणि लादलेल्या श्रेष्ठत्वाखाली दबून मरतो बिचारा. रचनाकाराला संपवण्याचा दूसरा पर्याय म्हणजे चांगल्या कलाकृतीला अनुल्लेखानं मारणं, सर्वोत्कृष्ट रचनेला पूर्णपणे डावलणं किंवा त्या कलाकृतीवर अनावश्यक टीका करणं, जेणे करून तो लेखक लढून, थकून भागून, लेखणी मोडून स्वतःच मरेल.


नवीन कलाकृतींचा उदोउदो करताना स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अनेक विद्वज्जन जुन्या साहित्याला नाकारतात आणि साहित्यिकांवर, जे जनमानसात रुजले आहेत त्यांवर अनाठायी टीका करतात. पण हा विसर पडतो कि आपल्या विस्तारत असलेल्या प्रवाहाचे मूळ तिथेच कुठेतरी आहे.


लोकसाहित्यात जात्यावरच्या दळणात ओव्यातून जसं व्यथां वेदनांच्या चित्रणाचं दळण असतं तसं या लेखातील मरणाचं दळणं संपवताना आठवतं कि अति प्राचीन श्रेष्ठ ऋग्वेदात अनेक सुंदर ऋचा आहेत. उषा ,अश्व, जुगाराचे फासे ,उर्वशी- पुरुरवा ,लग्नानंतर सासरी पाठवली जाणारी कन्या असे असंख्य विषय आहेत. त्यात मला आवडलेली मरणाऱ्याच्या चितेवरची ऋचा आहे. सारांश असा 


,जन्मरहित हा जाणारा जो


राखेमध्ये जाईल मिसळून


चिंरंतन तो अजरामर तो 


दे उर्जा त्या अग्नीदेवता 


मातीमध्ये रुजून जाऊ दे 


राखेमधुनी झेपावू दे 


गगन नव्याने पुन्हा भेदू दे.


हे सगळं मनाला अस्वस्थ करणारं लिहित असताना 92 वर्षापर्यंत म्हणजेच मृत्यूपर्यंत सतार वाजवणारे दिलखुलास रविशंकर, 96 वर्षापर्यंत सदर लिहिणारे खुसखुशीत खुशवंतसिंग दिसतात. मृत्यूपर्यंत चित्रकलेतील नाविन्याचा ध्यास असलेले सौंदर्यप्रेमी एम एफ हुसेन दिसतात. तुम्ही मला आता पाहताय जेव्हा मी म्हातारी आणि कुरुप आहे .तुम्ही तेव्हा पहायला हवं होतं जेव्हा मी तरुण आणि कुरूप होते असं म्हणत मरेपर्यंत नवोदिताच्या उत्साहाने स्वतःचीच खिदळत खिल्ली उडवणारी अभिनेत्री जोहरा सेहगल दिसते. नाकात नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मृत्यू शय्येवर पडून असलेले निर्मल वर्मा दिसतात . तरीही अजून किती दिवस जगू शकेन हे डॉक्टरना वारंवार विचारतानाच मरणाआधी तीन महिने तसाच स्थितीत उपलब्ध साधनांच्या मदतीने एक उत्कृष्ट कथा नया ज्ञानोदयसाठी लिहून पाठवतात तेव्हा मी थक्क होते. स्वतः अनेक सुंदर गाणी प्रेम कविता लिहिणारे आणि समोरच्या नवोदिताची कविता ऐकणारे मंगेश पाडगावकर एक डोळा बारीक करून मी कधी कधी कानाचं मशीन लावायचं विसरतो असं मिष्किलपणे सांगतात आणि तितक्याच उत्साहाने नवोदतांच्या कवितेतील सौंदर्यस्थळेही उलगडून दाखवतात. लिज्जत पापडावर कविता लिहितात आणि मृत्यूपर्यंत तितकेच नवीन राहतात तेव्हा रचनाकाराचा मृत्यू होत नाही हा विश्वासही मनाला आश्वस्त करतो. मनातला आशावाद वाढतो. फक्त स्वतःला लहानात लहान होऊन प्रत्येक क्षणी नवं होता आलं पाहिजे.आजूबाजूची नवलाई टिपता आली पाहिजे. त्याचबरोबर परंपरा आणि नवतेचा सुरेख मेळ घालता आला पाहिजे हे मात्र जाणवत राहतं. 


लेखाचा समारोप करताना वाटतं माझी ही किडुक मिडुक लिहिण्याची उर्मी क्षीण होता होता कधीतरी संपेल. पण माझाही मृत्यू होईल हे वास्तव मला घाबरवत नाही. इतना तो करना स्वामी म्हणत हरी किंवा हर या आपल्या आराध्य ईश्वराचं रूप पाहता पाहता स्वतःच्या मृत्यूचा सोहळा बघणारा भक्त आठवतो. मी चार वर्षापूर्वी लिहिलेली जुनी कविता आठवते आणि तसाच असावा आपलाही मृत्यूसोहळा असं वाटतं. 


ओठावरती असेल हासू आणि पापणी किंचित ओली 


स्निग्ध, हळवी नजर जराशी असेल भवती भिरभिरणारी ।।


ओंजळ करूनी रिती फुलांची हातानी या पुसेन अलगद ।


भाळावरचे घर्मबिंदू अन टिपून घेईन हळुच पापणी ।।


वाजत गाजत ये वा गुपचुप। तुला यायचे तेव्हा तू ये! 


असे कितीसे नटावयाचे ?येईन संगे कानी साद दे।। 




.04-02-13...6.42 संध्या. (पुनर्प्रत्ययाचा आनंद )




स्वाती ठकार 









Friday, November 20, 2020

सो स्वीट नं

 

सो स्वीट नं !

“ मेघु ,आज संध्याकाळी शाळेतून येताना काळे काकुंच्या बागेतनं सोळा सोळा पत्री ,दुर्वा ,आघाडा घेऊन ये .. हो आणि उद्या घरी ताईची मंगळागौर आहे.तिच्या सासरची मंडळी येतील संध्याकाळपर्यंत ..उद्या शाळेला येणार नाही म्हणून सांग पाटील मॅडमना ...संध्याकाळी हळदीकुंकवालाही यायला सांग त्याना..काळे काकूना पण सांग ग ! ” वाळलेल्या कपड्यांचा भलामोठा गठ्ठा मेघनाच्या कॉटवर आणून टाकत आई म्हणाली .

“ ए आई , हे सगळं ताईच्या खोलीत नेऊन टाक .आणि हो ..मी उद्या दांडी आजिबात मारणार नाही .उद्या गणिताची टेस्ट घेणार आहेत सर ....नवीन सर आहेत.. व्हेरी स्ट्रिक्ट ..तुझं काय जातंय दांडी मार म्हणायला ! ” मेघना फणफणली.

खरंतर तिला आईनं सांगितलेल्या कामातलं एकही काम करायचं नव्हतं ....सगळे नुसते ताईच्या मागं मागं !..ही ताई पण पहिल्या पासून अशीच. कायम सगळं आयतं मिळवायची ..स्वार्थी आहे अगदी .स्वतःचं काही म्हणजे काही देणार नाही.. मेकप बॉक्सला हातही लावू देत नाही ..स्वतःला करीना कपूर समजते .. मेघना मनात फणफणत होती .तसं तिचं आणि ताईचं कधीच जमलं नाही ..मोठ्या मानसीला छोटा भाऊ हवा होता पण झाली भांडकुदळ बहीण आणि मेघनाला मोठा दादा हवा होता पण आधीच ही बया आलेली ....त्यात वयात सात आठ वर्षाचं अंतर .कायम ताई मोठी म्हणून दादागिरी ...तरी बरं बाबा मेघुचे खूप लाड करायचे .मस्ती करायचे .तिच्याशी खेळायचे ..पण त्यांच्या कॉलेजला जेव्हा सुट्टी असायची तेव्हाच .पेपरचे गठ्ठे तपासायला आले की ती ते रुममध्ये गुडुप व्हायचे .

फक्त एवढ्याच कारणासाठी तिला ताईचा राग येत नव्हता .ताईनं तिचा सगळा प्लॅन ओम् फस केला होता . तिच्या रागाचं मुख्य कारण हे होतं की काळे काकुंच्या हँडसम अमितवर तिचं प्रेम असताना तिनं त्याला सोडून आडदांड काळुंद्ऱ्या जिजूशी लग्न केलं . कितीतरी वेळा त्यांच्या नोटसची देवाण घेवाण तिनंच केली होती .जिजूशी लग्न का केलं? तर म्हणे अमित कंपनीत साधा इंजिनीअर आहे आणि जिजू असिस्टंट मॅनेजर! हे काय कारण झालं ..अरे ,झाला असता ना अमितपण मोठा मॅनेजर ..हिला मुळी धीरच नाही .

पूअर अमित,इतका स्वीट चॅप , ताईच्या लग्नानंतर गेला अमेरिकेला .तिथेच राहणार आहे असं काळे काकू म्हणत होत्या .त्यानाही त्याची खूप आठवण येत होती ..बिचारा एकुलता एक मुलगा इतका दूर गेला .सगळं ताईमुळं झालं .प्रेमभंग फार वाईट रे बाबा !
खरंतर मेघुलाच लग्न करायचं होतं त्याच्याशी... पण ताईचं प्रेम होतं म्हणून तिनं इतका मोठा त्याग केला होता .खरंतर आताही ती त्याला प्रपोज करू शकत होती. पण तिला सज्ञान व्हायला अजून तीन चार वर्ष तरी लागणार होती .आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली हल्ली तिला नवीन आलेले गणिताचे संजू सर खूप आवडायला लागले होते . कसले हँडसम आहेत .. पण ...सो बोरींग.... सारखं ऋचाच्या हुशारीचं कौतुक करतात .

कालच स्पोर्टस् च्या तासाला ते मेघुला उद्देशून हेडसराना म्हणाले होते ,” सर ही मुलगी रनिंगमध्ये एकदम छान आहे ..पण गणिताकडे आजिबात लक्ष देत नाही !” तेव्हाच मेघूनं ठरवलं आपले बाबा एवढे मॅथ्सचे प्रोफेसर आणि आपण एवढे मठ्ठ ...आजिबात नाही ...आता मॅथ्स नंबर वन करायचं ...स्पोर्टस् मधे तर आहोतच ...मग काय !ऋचा आऊट… मेघू इन! मेघू, यू आर ग्रेट ! स्वतःची पाठ थोपटत ती गाणं गुणगुणत किचनमधे आली .बाबानी भुवया उंचावत खुणेनं विचारलं ,”आज काय स्पेशल !”
पण तिनं आपलं गुपित कुण्णालाच सांगायचं नाही असं ठरवलं होतं ...तेवढ्यात खुर्चीवर बसून टेबलावरच काडवाती करून ठेवत असलेली आज्जी खुद्कन हसली .मेघुनं जरा रागानंच तिच्याकडं पाहिलं ..
“ आज ताई येणार आहे ना ...प्रयोग वहीत आकृत्या काढून द्यायला ...मग काय आमचा गृहपाठ पूर्ण झालाच म्हणून समजा ! ” ही आज्जी पण ना ...मेघू वैतागली पण लगेच तिनं जीभ आपल्या दाताखाली ढकलत ,गाल फुगवत ,डोळे मिचकावले .
“अरेच्चा ,हे आपल्या कसं लक्षात आलं नाही !”
“ए आई ,मी शाळेतून आल्यावर कपड्यांच्या घड्या करते ..आणि हो येताना पत्रीही आणते हं हळदीकुंकवाचं अजून कुणाला सांगायचंय का ?नंतर त्रास द्यायचा नाही.खूप अभ्यास आहे हं मला ! ”म्हणत आईनं करून ठेवलेला पोळी भाजीचा रोल तोंडात कोंबला .
“ अग सावकाश खा !”म्हणत मागून आलेल्या आईचं काहीच ऐकून न घेता सायकल वर टांग मारली .

“ ही पोरगी म्हणजे एक तुफान आहे रे बाबा ! मी लिहून देते तुम्हाला ही एक ही काम धड करणार नाही !”
“नक्की करेल ”....बाबा
“बघाच तुम्ही .” .....आई
“अर्धवट नक्की करेल! तीनचार प्रकारच्या पत्री आणेल आणि एखादं आमंत्रण नक्की देईल ”… आजी पदराआड खिदळत म्हणाली ...

----------------------------------------------------------------------------------------------------

“काय ग आणली का पत्री वगैरे ! ”सायकल दाणकन आपटून घरात शिरणाऱ्या मेघुच्या मागे मागे जात आईनं विचारलं ..
“तुझं तूच आण सगळं ..मी काही काम करणार नाही तुझं !”म्हणतं ती ताडताड खोलीत निघून गेली आणि खोलीचं दार धाडकन लावलं ...उशीत डोकं खुपसलं आणि मुसमुसू लागली ..तसंच कारण होतं ना ! तिला वर्गात मोनूनं सांगितलं कि संजू सर फक्त दोन महिनेच शिकवणार आहेत .ते युपीएससी परिक्षेत पास झालेत ...त्यांचा साखरपुडा झालेला आहे . ते लग्न करूनच ट्रेनिंगला जाणार आहेत “ हेच करायचं होतं तर आले कशाला शिकवायला !”
“ काय म्हणतात तुझे संजू सर !” आजीनं विचारताच ..ती एकदम भडकली ,या आजीला ना काही म्हणजे काही सागितलं नाही पाहिजे .
“माझे कुठलं ...माझे म्हणे ...आणि हे बघ सारखं चिडवायचं नाही हं मला ...काही खास नाहीत एवढे ते ... हो आणि ते आता जाणार आहेत बरं का ! काढून टाकणारेत त्याना दोन महिन्यात ..जोग सरच छान शिकवत होते ..तेच आम्हाला गणित शिकवणार आहेत ..”
तिन्हीसांज होता होता ताईच्या सासरचे सगळे आले .जिजू पहाटे येणार होते ..घरात एकदम धमाल सुरू झाली .मेघूनं शहाण्यासारखं सगळं सामान नीट लावलं ..काळे काकूनी सदुकडून दूर्वा पत्री काढून ठेवली होती . सायकलला टांग मारून तिला फक्त घेऊन यायची होती .

सगळे खूप आनंदात होते... पण ते तिच्यापासून काहीतरी लपवत होते .स्वयंपाक घरात खूसखूस सुरू होती ..ताईचे तर केवढे लाड सुरू होते ...

मेघुच्या खोलीत ताई आली तेव्हा मेघू आईनं केलेल्या कपड्यांच्या घड्या टेबलावर नीट रचत होती .ताई मेघू जवळ आली .आपल्या पर्समधलं नवं कोरं मेकअप कीट तिला काढून दिलं आणि म्हणाली ,” हे जिजूनं खास तुझ्यासाठी आणलंय दिल्लीहून! ” तिचा गालगुच्चा घेत ताई म्हणाली.
“ आता एकदम गुड गर्ल व्हायचं बरं का !तू मावशी होणारेस ..कळलं का बाई ! ”
मेघु बघतच राहिली ..आत्ता तिला कळालं ताई का फार्मात आहे ते !. अरेच्चा म्हणजे मी मावशी होणार तर !..तिनं ताईच्या पोटाला अलगद हात लावला आणि दोघी खुदु खुदु हसायला लागल्या .
“ ए ताई मी पटकन माझ्या सासरी जाऊन दुर्वा पत्री घेऊन येते ” तिच्या कानाशी कुजबुजली तसा ताईनं नाटकीपणानं कपाळाला हात लावला आणि हसायला लागली .

काळे काकुंकडे तिनं ओल्या नारळाच्या करंज्या खाऊन,छान गप्पा मारल्या .त्याना दारात छान रांगोळी काढून दिली.भांडी सेल्फवर लावून दिली .काकूनी प्रेमानं तिच्या गालावरून आपली बोटं फिरवून कपाळावर नेऊन कडाकडा मोडली .तशीही मेघूच ताईपेक्षा काकूंची लाडकी होती . त्याना हळदी कुकंवाचं सांगून फुलं पत्री वगैरे सामान घेऊन ती आनंदानं घरी आली .आज काकू किती खुश होत्या ..!अमित दिवाळीत महिनाभर सुट्टी काढून येणार होता ना !

रात्री ताईजवळ झोपलेल्या मेघूच्या स्वप्नात आडदांड जिजू ,थोडं गबदुलं काळं थोडं गोरं बाळ ,आई ,बाबा ,सगळे आलटून पालटून येत होते ...हो आणि अमेरिकेहून तिला खास मागणी घालायला अमितही आला होता जीजूपेक्षाही छान छान गिफ्टस् घेऊन ...
स्वप्नात ....

सो स्वीट ना !

स्वाती ठकार


खुळं घर.. शहाणं घर

 

खुळं घर ....शहाणं घर
1
नीताताईनी घड्याळात पाहिलं .साडे सातला दहा मिनिटं कमी होती .
"बापरे आजकाल खरंच आपला उरक खूपच कमी झालाय ! जागही लवकर येत नाही.मध्यरात्री जाग येते नंतर झोप लवकर लागत नाही! आणि नेमकं पहाटे जेव्हा उठायला हवं तेव्हा डोळा लागतो ."
सकाळची घाईची वेळ. नीताताईंची धावपळ वाढली. निनादरावांचे ऑफिसला निघणं नऊचं, त्याआधी पावणे नऊला ऋचा तिच्या ऍक्टिवावरून कंपनीत जायची .ही त्यांची लेक सीए झाली होती. मोठ्या पगारावर ऑडिट फर्म मध्ये काम करत होती. तिच्यासोबतच पल्सरवरनं धाकटा ऋषी जायचा. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता ..आज उद्यात तोही कँपसमधे सिलेक्ट होईल. उच्च मध्यमवर्गीय संस्कारक्षम घर होतं ते ..वर वर सारं काही आलबेल पण ...हल्ली वयाच्या पन्नाशीच्या जवळ येताना नीताताई थकत चालल्या होत्या . त्यांच्याकडे लक्ष देण्याइतका वेळ कुणाजवळही नव्हता .प्रत्येकजण आपल्याच व्यापात .अर्थात् त्या सर्वांची धावपळ नीताताईना दिसत नव्हती असे नाही. पण त्याना नेहमी वाटायचे कुणीतरी दिवसातून पाच दहा मिनिटं आपल्याला जवळ बसावं ,आपल्याला काय होतंय हे समजून घ्यावं .
ऋचा वयात येत होती तेव्हा त्यानी आपली शिक्षिकेची कायमस्वरूपी हक्काची नोकरी सोडून पूर्णवेळ स्वतःला घरी वाहून घेतलं ....लाइटबिल ,फोनबिल, बाजारहाट, आले गेले पै-पाहुणे, कामवाल्या बायांच्या वेळा पाळता पाळता त्या थकून जात होत्या ..त्यात ऋचाच्या लग्नाचंही अतिरिक्त टेन्शन त्याना येत होते ...बाकी कुणीच हे गांभीर्यानं घेत नव्हतं.' सारं कसं वेळच्या वेळी व्हायला हवं !'असं त्याना वाटत होतं.
"ए आई चहा देतेस ना ...!ऋचा आत येत म्हणाली .त्यांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे ती निरखून पाहू लागली.
"का ग बरं वाटत नाही का ?"तिने जवळ येत त्यांच्या गळ्याला हात लावून पाहिलं...
" ताप नाही. पण थकल्यासारखी दिसतेस तू आज!"
तिच्या शब्द आणि स्पर्शानं नीताताईना गहिवरल्यासारखं झालं
" काही नाही ग हल्ली झोपच लागत नाही नीटशी रात्री !
"दिवसा झोपत असशील ! मग कशी लागेल झोप ? निनादराव आत येता येता म्हणाले. "बाबा ,कधी झोपणार ती ...?पूर्ण दिवस तिचा कामात जातो ! एक दिवस घरात राहून पहा म्हणजे कळेल !" लेकीनंच उत्तर दिल्यानं त्या सुखावल्या . खरंच लेकीला जी माया असते ती इतर कुणालाच नसते !
"ए आई, माझी बायोडाटा फाईल पाहिलीस का? हुश्श सापडली ग! बेडरूममधूनच ऋषीनं समस्या आणि समाधान दोन्ही कळवलं .
“ तसं मी सगळं जागच्या जागी नीटच ठेवतो “ किचनमधे येत डोळे मिचकावत ऋषी म्हणाला .आईला घट्ट मिठी मारत लाडात येत तो म्हणाला ,” आई ग ,आज कँपसला कंपन्या येणार आहेत...हो आणि मला आज यायला उशीर होईल..जेवायला मी नाहीय ." ऋषी ताईच्या आधी तिनं काढलेल्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी बाथरूम मधे पळाला ...पुन्हा दोघांची भांडणं, दाराची आदळ आपट , एकच गोंधळ .
"आई, आज मलाही उशीर होईल..आज बजेट मिटिंग आहे ...नंतर जेवणही आहे !ऋचा चहाचा घोट घेत म्हणाली.
"हो आज माझीही क्लाएंट मिटिंग आहे ...रात्री मी जेवायला नसेन कदाचित " ...निनादराव चहा घेता घेता म्हणाले ..
"कुणीतरी यावेळी इलेक्ट्रिक बिल भराल का? गेल्यावेळी तारीख उलटून गेल्यावर भरल्यामुळे यावेळी मेन ब्रँचला जाऊन पावती दाखवून करेक्शन करावी लागेल !" नीताताई क्षीण आवाजात पुटपुटल्या .
"मला एक कळत नाही? घरातच तर असतेस तू! या गोष्टी वेळच्या वेळी का होत नाहीत ?" निनादराव कुरकुरले .नीताताईना वाटलं मघाचा गहिवर आता हुंदका होतोय की काय
"ए ऋषी, तू का नाही भरत सगळी बिलं? तुला काय काम असतं? बाहेरचीही सगळी कामं काय आईनंच केली पाहिजेत काय...?” कप ओट्यावर ठेवत ऋचा बुडबुड अंघोळ करून आलेल्या ऋषीला म्हणाली ...
".मी तर अजून कमवत पण नाही .तू कमवतेस ना . तुला नाही भरता येत का ग सगळी बिलं नेटवर ..?"तिचं बोलणं संपायच्या आत ऋषीनं बाणेदारपणे परतफेड केली . नंतर बराचवेळ दोघांची वादावादी चालली...हे नीताताईना नवीन नव्हतं ...
"ऋचा, मला मंडळात तुझं नाव नोंदवायचं आहे ...दिवाळीच्या पाडव्याला सव्वीस पूर्ण होतील तुला ..पोस्टकार्ड साईज फोटो दे ग बाई मला एक ! "आवंढा गिळत, विसरायच्या आधीच आवरून निघणाऱ्या ऋचाला आठवणीनं नीताताई म्हणाल्या.
"इतक्या लवकर मुळीच नाही हं आई !" म्हणत गाडीला किक मारून ऋचा गेली .पाठोपाठ ऋषी आणि निनादराव दोघेही गेले .आणि घर एकदम शांत झालं .तेवढ्यात फोन वाजला
"ताई ,मी कमल बोलते .माझ्या पोराला रिक्षानं ठोकलंय. हा मुडदा ढोसून पडलाय ह्यालाच शुद्ध नाही. मी आणि सारिका त्याला ससूनला नेतोय . मी दोन दिवस येत नाही ताई. जमलं तर उद्या सारिका येईल !"कमलचा रडवेला आवाज.
"पैसे लागले तर सारिकाला पाठव! काळजी करू नकोस! नीट दाखव डॅाक्टरना !" नीताताईनी तिला उभारी देण्याचा प्रयत्न केला. कमलचा प्रॅाब्लेम जास्त गंभीर आहे म्हणत त्यानी होतील तितकी भांडी घासून काढली ..कपडे भिजवून मशीनला लावले आणि लादी पुसायचं उद्याच बघू म्हणत हॅाल आणि किचन कसंबसं झाडून घेतले .बेडरूम्सवर नजर फिरवली .ऋषीच्या रुमचा पसारा बघून त्या तिथल्या बेडवर मटकन बसल्या .’अरे देवा ,हे कधी आवरू? ’ पंख्याकडं बघत, हात वर करत हातातला झाडू फिरवत , म्हटलं तर पंख्यावरच्या जळमटाला म्हटलं तर वरच्याला हात जोडत त्या म्हणाल्या . तिथल्या चिकट्यातनं लोंबणारी दोन चार जळमटं कशीबशी बेडवर पडली ...मरू दे .नंतर बघू म्हणत त्या खोलीतून बाहेर पडल्या .
मुलं लहान असताना ही सर्व कामं त्या स्वतः करत होत्या. मुलाना शाळेत पोहोचवून आठवी नववीचं गणित विज्ञानही शिकवत होत्या .पोरांच्या लाडक्या आदर्श शिक्षिका होत्या त्या. .हेडबाईनी नोकरी सोडताना दहा वेळा ‘विचार कर’ असा सल्ला दिला होता. पूर्णवेळची चांगल्या पगाराची नोकरी सोडून काय मिळवलं आणि काय गमावलं याचा ताळेबंद आज नव्यानं त्या करत होत्या. मुलं शाळेला गेल्यावर तशा त्या दोन तास शाळेत जावून गणित विज्ञान शिकवत होत्या. पण हल्ली सगळं बंद केलं होतं.
‘घरातच तर असतीस. एवढंही जमत नाही का ..हे शब्द आज का इतका त्रास देत होते?’ हल्ली उभारी, उरक कमी झालाय. सारखा थकवा येतोय. त्यातच हल्ली हे सारखं रडायला का होतय तेच त्याना कळत नव्हतं .हा प्री मेनोपॅाजचा त्रास असेल तर अजून चार एक वर्ष तरी सोसावं लागेल ...हे त्यानी मनाला बजावलं ...
आवरता आवरता पावणे बारा वाजले होते .त्या बिल घेऊन घराबाहेर पडल्या .

2

ऋषीच्या कॅालेजच्या बाहेर एकच हुर्यो चालला होता ...दिवसभर ऍप्टी टेस्ट ,ग्रूप डिस्कशन ,आणि शेवटी इंटरव्ह्यू एवढ्या चाचण्या पार करून कट्ट्यावर सर्वजण कंपनीच्या सिलेक्शन लिस्टची वाट बघत होते ..
“आयला व्हायला पाहिजे रे सिलेक्शन जित्या आपलं ...!”ऋषी जितेंद्रला म्हणाला
“पण मला एक कळत नाही ओंकार का नाही आला कँपसला ?”जितेंद्र ऋषीला म्हणाला .
“कुणास ठावून ..?दोन दिवस दिसलाच नाही मला ....!”
तेवढ्यात दोघाना शिल्पा दिसली ..
“हे काय ग रंभे! तू आणि ओंकार दोघांची कँपसला दांडी! गेट देताय की काय? नोकरी पदरात आधी पाडून घ्या मग द्या ना गेट वगैरे! नाहीतर ना घरचे ना घाटचे व्हाल!”जितु म्हणाला .
शिल्पा न बोलता बसली होती .
“तू होतीस कुठे ?”तिच्या जवळ जात अनूजानं विचारलं.
“ओंकारची मम्मी !”तिनं हातानंच गेली अशी खूण केली.
“म्हणजे?” सगळे एकदम किंचाळले
“ सुसाईड! पोलीस केस ...”शिल्पा थकलेल्या आवाजात म्हणाली .
“अरे पण का?” ऋषी हाललेल्या आवाजात बोलला. त्याला आपल्या गळ्यातून आवाजच निघत नाही असं क्षणभर वाटलं .
“अलिकडं तिला थोडा तब्येतीचा त्रास होत होत होता .घरातली कामं करून थकायची .सारखी चिडचिड करायची . कुणाला माझी गरजच नाही .माझ्यापेक्षा कामवाली बरी. ती तरी सुट्टी घेते. वर मोजून पैसेही.वगैरे वगैरे बडबडायची म्हणे. मधेच रडत राहायची”शिल्पा थांबून थांबून सांगत राहिली
“डॅाक्टरला दाखवलं नाही ?”अनुजाचा प्रश्न
“दाखवलं ना .वयाच्या या टप्यावर शरीरात बदल होत असतात. तसा मानसिक तणावही वाढतो. त्याच्या घरी कुणाला इतकं होईल असं वाटलं नाही रे ! “शिल्पा बोलता बोलता थांबली .
“हो ग ! प्री मेनोपॅाज सिम्टम असतात हे. दोन चार वर्ष जपावं लागतं. अशा वेळी मुलं मोठी होत असतात . नवरे रिटायरमेंटकडे येत असतात . मुलांची शिक्षणं. लग्नं या सर्वांचे ताण सगळ्यानाच पेलता येत नाहीत. इन एफिशिएन्सीची भावना बळावते. बऱ्याच आया या काळात असं टोकाला जातात .आईकडे असे बरेच पेशंट काउन्सेलिंगला येतात...”राधिका म्हणाली
“याच्यावर उपाय काय असतो ग मग ?”आता कँपसच्या रिझल्टचा ऋषीला विसर पडला..त्याला सकाळचे घरातील डायलॅाग आठवले. अगदी असेच होते ते .
“होम काउन्सेलिंग इज द बेस्ट सोल्युशन ! घरच्यानीच अशा पेशंटला आधार देऊन सावरायचं असतं रे! औषधं वगैरे तात्पुरते पर्याय असतात ! राधिका म्हणाली.
“अरे ऋषी, कुठं निघालास? लिस्ट बघायला थांबत नाहीस का? जितु ऋषीच्या बाइक मागे धावत म्हणाला.
“जित्या, प्लीज तूच बघ आणि कळव मला मी घरी जातोय रे!”म्हणत ऋषी वेगात घराकडे निघाला

3

घरात दाखल होतोय तर घराला मोठं कुलूप. त्यानं आईला फोन लावला . फोन नुसता वाजत होता .नंतर लक्षात आलं फोन तर बाहेरच्या ग्रीलच्या आत खिडकीच्या कडाप्यावर वाजत होता. त्यानं आत हात घालून फोन घेतला . दाराला भलं मोठं कुलूप . आई गेली कुठं ? कुठं शोधायचं तिला ? त्याचे हातपाय लटा लटा कापायला लागले .तो बाईक सिंगल स्टँडला लावून मटकन तिथंच पायरीवर बसला.
शेजारच्या बंगल्यातले राव काका त्याला बाहेर बसलेला बघून त्याच्याकडे आले .
“कँपस झाली का सुरू ? सो यंग बॉय हाऊ आर यू डुइंग? ”त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पायरीवरून ताडकन उठून ऋषीनंच प्रश्न केला ,
“काका आईला पाहिलंत का ?”
“दुपारी भर बारा वाजता उन्हात निघाल्या होत्या लाईट बिल भरायचंय म्हणाल्या ... ससूनला जायचंय असंही म्हणत होत्या ..रिक्षाची वाट बघत होत्या .स्कूटी बंद आहे वाटतं त्यांची. आल्या नाहीत का अजून? फोन कर ना! तुझ्याकडे चावी नाही का ? आमच्या घरी चल वाटल्यास. येतील त्या. अरे सरकारी काम म्हणजे हल्ली व्याप झालाय. इकडून तिकडं नुसतं पळवतात.“ कधी नव्हे ते कुणी ऐकणारा मिळाला असावा त्याला बोलू द्यायचंय नाही अशा थाटात काका एकटेच बडबडत घराकडं वळाले .
कुठं असेल बरं आई! आईला काही होतंय काय ? फॅमिली डॉक्टर सोडून ससूनला का बरं ? आपण नोकरी करत नाही ही गिल्ट तर नसेल ..खर्च नको म्हणून ...अरे देवा ...ऋषीचं विचारचक्र जेट स्पीडनं धावत होतं ..चावी जवळ ठेवायची कधी वेळच आली नाही. घर कायम उघडं असायचं . आई किती दिवस म्हणत होती कुणीतरी जरा गाडी सर्व्हिसिंगला टाका. आता ऋषीला राहवेना.
कमलकडं घराची एक चावी असते.तिला फोन करून बघावा म्हणत त्यानं आईच्या फोनवरून तिचा नंबर लावला ..आणि नंतर पाच मिनिटं कमलचं दुःख ऐकावं लागलं ...पोराला रिक्षानं ठोकलं... डॉक्टरलोक लक्षच देत नव्हते ...आई तिथं गेली ..योगायोगानं तिचा विद्यार्धी तिथं डॉक्टर होता ..म्हणून पोरगा वाचला ...अजून शुद्धीवर यायचाय ..पण धोक्याच्या बाहेर आहे ....आई येऊन पैसे देवून गेली म्हणून एवढं तरी झालं ..एवढं सांगून शेवटी तिनं त्याला बागेत मागच्या बाजूला तुळशीच्या कुंडीत दगडाखाली चावी असल्याचं सागितलं .
ऋषीनं दार उघडलं ..बॅग ठेवायला त्याच्या खोलीत गेला.बेडवरची जळमटं बघितली ...बापरे आपण आईला किती कामं लावतो ..म्हणून तर आई कंटाळली नसेल! ताई तिची रूम छान ठेवते ..आज ऋषीला अपराधीपण जास्तच जाणवत होतं ...ओंकारच्या आईसारखा त्रास आपल्याही आईला तर होत नसेल ना! आई ये ना ग लवकर रडवेल्या आवाजात म्हणत तो रूम आवरू लागला ..लहानपणी आईला शाळेतून यायला उशीर व्हायचा तेव्हा तो याच रडवेल्या आवाजात आईला सांगायचा. त्यानं ताईला फोन लावला ..रडवेल्या आवाजात आई घरी नाही आहे आणि फोनही घरीच आहे हे सांगताना त्याला हुंदकाच फुटला.
.त्यानं बाबानाही फोन लावला . त्याचा थरथरता आवाज ऐकून दोघेही तासाभरात हजर झाले नीताताईंचा पत्ता नाही. घरात आल्यावर नीताताईंच्या फोनवरून कुणाला फोन करावा बरं आणि काय विचारावं याची चर्चा सुरू झाली. संकोच बाजूला ठेवून जवळच्या मैत्रिणीना नातेवाईकाना विचारलं ...उत्तर नाही असंच होतं. नीताताई काही येत नव्हत्या पण पाच पाच मिनिटानी ज्याना फोन केला त्याच मंडळीचे फोन येत राहिले. ऋषीला हुंदकाच फुटायचा बाकी राहिला ..ऋचा त्याच्या जवळ जाऊन याला पाठीवर थोपटत म्हणाली ,” अरे येईल आई ऋषी रडतो काय वेड्या ....डोंट वरी!”
“ ताई मला आई पाहिजे ग ” ओंकारची मम्मी अजूनही ऋषीच्या डोक्यातून जात नव्हती .
“ आणि आम्हाला नकोय होय रे तुझी आई ! ” केविलवाणं हसत बाबा म्हणाले .
“ तू एवढा का पॅनिक होतोयस ऋषी ?” ऋचा त्याला थोपटत म्हणाली ...आणि एका मोठ्या हुंदक्यासह ओंकारच्या आईचा किस्सा त्यानं दोघाना रडतच सांगितला ...वातावरण सून्न झालं
“ वेड्या, तुझी आई काही एवढी लेचीपेची नाही ...आपल्या घरात असला त्रास कुठंय तिला ? आणि ती असलं कधीच करणार नाही ...तुम्हा दोघावर किती जीव आहे तिचा !” निनादराव जरी त्याला समजावत म्हणाले तरी आतून हलले होते . सात साडेसात पर्यंत वाट बघू असं ठरलं ..तिन्हीसांजेची किर्र वेळ अजूनच भिती वाटू लागली ..त्यात ओंकारच्या मम्मीच्या काळोखानं घर व्यापून टाकलं होतं. ऋचानं आत जावून देवापाशी दिवा लावला ..अगरबत्ती घरभर फिरवली ..एरवी हे असलं ती कधीच करत नसे ..
“ताई ,आई काहीतरी सांगायची ना ग ...वक्रतुंड महाकाय म्हटलं की हरवलेली वस्तू सापडते म्हणून! ” ऋषीनं वक्रतुंड नॉनस्टॉप सुरूच केलं ..
“ अरे राजा, आई वस्तू आहे का रे ! येईल आई .नको घाबरू.” ऋचा त्याच्या जवळ जात उदास हसत म्हणाली
“ए ताई, आईला कशाला माझी काळजी ग .आलीच तर येईल ती तुझ्यासाठी .माझ्यापेक्षा आईचं प्रेम तुला जास्त मिळालंय आणि असंही तिचा जीव तुझ्यावरच जास्त आहे ..मला माहिताय ..परवाच्या रविवारी आई कमलला सांगत होती ताईच्या खोलीचा केर काढू नको.झोप पूरी होऊ दे तिची . झोपू दे तिला .नंतर बघू.ऋषीला उठव . ऋषीची खोली मात्र नीट झाड.” ऋषी आठवून हिशोबचुकता करत होता .
“अरे किती घाण करतोस तू खोली ..माझी रूम मी छान ठेवते .” ऋचा समजावत म्हणाली
“ नको सांगू तू काही ..आई कमलला सांगत होती .इथंच काय ती आराम करेल माझी ताई. बिचारी दोन वर्षाची असल्यापासून ताईपणात अडकलीय .फार समजुतदार आहे ग ..तिला छान नवरा मिळू दे ..कसं होणार माझं ती सासरी गेल्यावर ..ती तुझाच विचार करते.तूच लाडकी आहेस तिची .”
“कळालं ना ऋषी, ताई सासरी जाणार आहे .तू कायम तिच्याजवळच असणार आहेस ” बाबा म्हणाले
ऋचाला एकदम भरून आलं .खरंच होतं. तिच्याच साठी आईनं करिअरवर पाणी सोडलं. आयुष्याच्या एका टप्प्यावर शरीरात बदल होत असताना घाबरलेल्या ऋचाला किती छान समजावत आईनं तयार केलं होतं

4

ऋषीचा फोन वाजला .जितूचा फोन होता.त्याचं सिलेक्शन झालं होतं .उद्या पेपर्स जमा करायचे होते ...कंपनीनं एकच उमेदवार सिलेक्ट केलाय .तो तू आहेस .हे ऐकलं .जितूच्या पार्टी पाहिजेचं स्वागतही त्यानं थंडपणे केलं ...
ऋचा आणि बाबानी त्याचं अभिनंदन केलं ...ऋषी धावतच बेडरूम मधे गेला ..बेडवर पालथा पडून हमसून रडू लागला ..ताई आणि बाबा आत गेले ...हुंदके देत त्यानं सांगितलं खरतर ही बातमी सगळ्यात आधी त्याला आईला द्यायची होती.अलगद उचलून, घरभर फिरवत, हळूच कानात सांगून सरप्राईज द्यायचं होतं .. ऋषी नेहमी नीताताईना उचलून घरभर फिरवायचा ...मग ऋचा चिडवत म्हणायची अरे नुसतं काय उचलतोस तिला? सोबत गाणं पण म्हण, म्हटलं की हिमेश रेशमियाची गाणी म्हणत आईला घरभर फिरवायचा .
सगळे हॉलमधे आले .यापुढं प्रत्येकानं आईची कशी काळजी घ्यायची हे ठरवलं.सगळ्यानी तिला पुरेसा वेळ द्यायचा. त्यात बाबानी तिला उठसूठ डिवचायचं नाही .टोमणे मारायचे नाहीत ..ऋषीनं आपली कामं आपण करायची ,आणि ताईनं ताबडतोब पोस्टकार्ड साईज फोटो द्यायचा यावर कधी नव्हे ते एकमत झालं .
दारात कारचा आवाज आला .आई कारमधून उतरली ..आईचा एक विद्यार्थी तिला सोडायला आला होता ..आईच्या हातात शाल, नारळ ,बुके पाहून सगळेच चकित झाले ..
“अग ऋचा, तुला आठवतो का ? दोन हजारच्या दहावी बॅचचा चंदन देशमुख .आय ए एस झालाय ..त्याचा शाळेत सत्कार होता म्हणून गेले होते..वेड्यानं सगळे शिक्षक सोडून माझाच सत्कार केला ...थँक्स राजा ...असाच यशस्वी हो . ”
“ मॅडम ,ऋचा किती मोठी झाली ..मला आपली दोन वेण्या घालून युनिफॉर्मच्या खिशात हात घालून, टॉक टॉक बुटांचा आवाज करत शाळेत फिरणारी ऋचा आठवते .”
“अरे बाबा आता सीए झालीय ती..अरे असाच काय जातोस ? आत ये ना ,चहा घेऊन जा. “ नीताताई म्हणाल्या
नीताताई किती ग्रेट टीचर आहेत हे सांगत, ट्रेनिंग संपल्यावर निवांत जेवायलाच येईन असं भरघोस आश्वासन देत चंदन देशमुख निघून गेला.
नीताताई जरा टेकतात तोपर्यंत ऋषी आईच्या मांडीवर पडून मुसमुसू लागला ..नीताताईनी हातानंच काय झालं असं ऋचा आणि निनादरावांना विचारलं ..आणि स्वतःच काहीतरी आठवून म्हणाल्या ,” अरे एक कंपनी गेली म्हणून काही बिघडत नाही ...आणि कशाला हवीय रे एवढ्या लवकर नोकरी ..असं काय वय आहे तुझं ? गेट दे एमई ,एमटेक कर ..नाहीतर एमबीए कर ! अरे बाबा ,तुझ्यापेक्षा माझा दिवस वाईट गेला ..बिलाची ही एवढी रांग..ससूनची रपेट. तिथली ती तुफान गर्दी, बिचारी कमल ,गरीबाच्या मागं नसते भोग रे बाबा .त्यात भरीला भर आज माझा मोबाईल ससूनमधे कुठंतरी पडला.”
घरात एकदम हशा पिकला. ऋचा आईचा मोबाईल नाचवत ऋषी का रडतोय ते सांगू पहात असतानाच ऋषी “ तायडे थांब !” असं ओरडला .त्यानं अलगद नीताताईना उचललं “आज मैं उपर आसमाँ नीचे ...आज मैं आगे जमाना है पीछे ” गात घरभर फिरवलं आणि हळूच कानात आपलं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं. सहा बोटं दाखवत लाखात पॅकेज सांगितलं .
“ऑ..काय करायचेत रे तुला एवढे पैसे? ” ऋचा ओरडली.
“गर्ल फ्रेंडसवर उडवीन..हाताला गजरा बांधून मुजऱ्याला जाईन ..सोन्याची कावड करून आईबाबाना काशीयात्रा घडवीन ..आणि उरले तर देईन तुलाही तुझ्या नवऱ्याला हुंडा म्हणून ..मी काहीही करीन .तुला काय करायचंय ? ” पुन्हा दोघांचं बॅडमिंटन सुरू झालं .
“आई, तू अशी न सांगता कुठं जात जावू नको बाई ..आम्हाला घाबरायला होतं.आणि या खुळ्याला आवरणं तर फार कठीण होतं ”एवढा वेळ ताईची भूमिका पार पाडणारी ऋचा आईच्या शेजारी बसत भरल्या गळ्यानं म्हणाली ..
“अग असं काय करतेस? तुम्ही सगळे उशीरा येणार होता. जेवायला घरी येणार नव्हता .म्हणून गेले ..हां मोबाईलचं मात्र लक्षातच आलं नाही ..हल्ली होतं असं विसरायला कधी कधी. मी आपली माझ्यापुरती खिचडी टाकणार होते ..आता तुम्हीही खिचडी खा माझ्या सोबत . ”

म्हणत त्या उठल्या त्याना तिथंच थांबवत निनादराव म्हणाले ,”आज मी करतो खिचडी ..कशी करायची ते फक्त सांग ..”

“ओह.. नो .” शांत बसलेले ऋषी आणि ऋचा दोघंही ओरडले .
“ आज ऋषीची नोकरी आणि आईचा सत्कार याची पार्टी माझ्याकडून ..बाहेर जेवायला जावू.” ऋचा म्हणाली .

“ ए आई आम्ही सगळ्यानी ठरवलंय यापुढं तुझ्यासाठी वेळ देणार आहोत आम्ही. बाबा तुला टोमणे मारणार नाहीत .ताई पोस्ट कार्ड साईज फोटो देईल आणि मी माझी आणि तुझीही सगळी कामं करणार ” ऋषीनं सगळं एका दमात सांगितलं फक्त ओंकारच्या मम्मीचं जीव देणं सांगणं शिताफीनं टाळलं.ऋचा आणि निनादराव ‘कर्म’ म्हणत कपाळावर हात मारून हसू लागले
नीताताई एकाच वेळी तिघातील बदल टिपत म्हणाल्या ,

“ आज काही खरं नाही रे बाबा ...हे खुळं घर एकदम कसं काय शहाणं झालं बुवा? ”

स्वाती ठकार
(कथा चिंतन आदेश पाक्षिकात प्रकाशित)


भज गोविन्दम मूढमते

 

भज गोविन्दम मूढमते

                                1

गॅसवर बटाट्याचा रस्सा रटरटतोय. पोळ्यांसाठी मळलेल्या कणकेचा कुंडा ओढून राखीनं तवा गॅसवर ठेवला. आज रस्सा पोळीवरच भागवावंसं वाटतंय. भात टाकावा कि नको हा विचार आल्या आल्या झटकून टाकला. अम्माचा विचार आला आणि मऊ मुगाच्या खिचडीसाठी तिनं तांदुळ डाळ मुठीनं कुकरच्या डब्यात टाकली.
आज स्वैपाकाच्या शैलाताई सुट्टीवर आहेत. त्यांची पहिलटकरीण लेक सायली दवाखान्यात अॅडमिट आहे. आजची सुट्टी अजून लांबू शकते. स्वैपाकासोबतची टाइम मॅनेजमेंट जमवावी लागेल. शैलाताई लेकीच्या वयाहून लहान असल्यापासून अम्माकडं काम करतात. माळी , इस्त्रीवाला एवढंच काय रद्दीवालाही पंचवीस तीस वर्षापासून तोच. दर दिवाळीला अम्मा या सगळ्यांची भेटीची  पाकिटं स्वतः भरून त्यांची नावं टाकायची. आपल्या माघारीही  हे पोचेल याची चोख व्यवस्था केलीय अम्मानं . अम्माचं सगळंच खास.

बाहेर अम्मा झाडांना पाईपनं पाणी टाकतेय. तोंडानं चर्पटपंजरिका स्तोत्र म्हणतेय. अम्माचा थरथरता आवाज ऐकला कि झाडावरची चिमणी पाखरं भोवती गोळा होतात. तिच्यासोबत गप्पा मारत असल्यासारखा किलकिलाट करतात. बऱ्याचदा अम्माही त्यांच्याशी मल्याळममधे बोलत राहते. जवळचा संवाद साधण्यासाठी मातृभाषाच का बरं लागत असावी तिला ? राखीला प्रश्न पडे. नंबुद्रीपाद ब्राह्मण अम्माची शंकराचार्यांची सगळी स्तोत्रं तोंड पाठ. हे स्तोत्र तर खास आवडीचं आहे तिच्या. रोज ऐकून अर्थासह राखीचंही तोंडपाठ झालं होतं.

भज गोविन्दं भज गोविन्दं
गोविन्दं भज मूढमते
सम्प्राप्ते सन्निहिते काले
नहि नहि रक्षति डुकृङ्करणे

अम्मा सुरात गात होती. म्हणायला सासू पण आलेल्या संकटात आईसारखी मागं उभी राहिली. राखी अम्माची शेजारीण प्लस तिची राज्यशास्त्राची विद्यार्थिनी. घरी येणं जाणं लहानपणापासून. अम्मा- राघवकाका कट्टर कम्युनिस्ट. राघवकाका युनिअन लीडर. राखी दहावीत असताना जुनी सोसायटी सोडून अम्मानं युनिवर्सिटी जवळ जागा घेऊन टुमदार कौलारू बंगला बांधला. भल्या मोठ्या मोकळ्या जागेत झाडं लावायला सुरवात केली. आज जंगल झालं आहे. अम्मानं बोअरवेल ऐवजी छोटं आड खोदलं आणि बागेतील झाडांची पाण्याची सोय करून टाकली. पावसाचं पाणी आडाच्या पुनर्भरणीसाठी वापरायची योजना म्हणजे अम्माची अत्युच्च कल्पकता.
अधून मधून सुटीला राखी अम्माकडं नव्या घरी यायची. पण एम. ए. ला असताना  राखीचं वारंवार घरी येणं-जाणं सुरू झालं. रजतनं अम्माला राखी आवडते असं सांगितलं. पण राखी लग्नाला तयार नव्हती. तेव्हा लेकाची बाजू घेऊन अम्मा समजूत घालायला घरी आली होती. बाबा आई नाहीच म्हणत होते. रजतवर राखीचा आजिबात विश्वास नव्हता. रोज नवी मुलगी सोबत असते त्याच्या. नात्याबद्दल आजिबात गंभीर नाही. हे सगळं वरवरचं कारण पण तिच्याही मनात कुठंतरी रजत रुजला होताच.
आधीच राघवकाका मॅनेजमेंटच्या भाडोत्री गुंडांकडून मारला गेल्याची पार्श्वभूमी घरी माहीत. त्यात रजत कम्युनिष्ट विचारसरणी सोडून भांडवलशाही कार्पोरेट जगात   स्थिरावू पहात होता. त्याचेही शत्रू कमी नसणार. शिवाय केरळी जावई पुन्हा. राखीच्या आईचा विवाह म्हणजे मराठीने केला बंगाली भ्रतार. घरात अजून धुमाकुळ .राखीच्या मोठ्या दोन बहिणीनी देखील बंडखोरीच केली होती.मोठी लोपा वकील होऊन गोवन मॅथ्यूच्या घरात गेली. मधली खादाड ग्रीष्मा हॉटेलवाल्या शिवानंद शेट्टीबरोबर बारावीतच पळून गेली. ग्रीष्माच्या पाठचा अखिल अमेरिकन ज्युलिया बरोबर अमेरिकेत संसार करत होता. एकंदर राखीच्या आईला जावई सुनांचं कसलंच अप्रूप राहिलं नव्हतं. त्यातल्या त्यात राखीला रीतसर मागणी घालायला अम्मा आली. राघवकाका आणि बाबा चांगले मित्र. दोघांची एकच पार्टी. दोघंही आपआपल्या क्षेत्रात युनिअनशी संबंधित. इतकं सगळं आईबाबांना सन्मानकारक होतं. ते हे लग्न होण्याची अनेक कारणं नातेवाईकाना देऊ शकत होते. आता बॉल राखीच्या कोर्टात होता.
राज्यशास्त्राच्या प्राध्यापक अम्मानं लेकासाठी खिंड लढवली. राखीनं लग्नाआधीच अम्माला बजावलं, मला पीजी, नेट सेट करून तुझ्यासारखं प्राध्यापक व्हायचंय. त्यात मदत करायची. जर नातं टिकलं नाही तर कडेपर्यंत तू सोबत राहायचं! सोबत अम्मा राहणारच होती. चार पोरांवर पत्ता नसताना आलेल्या , नकुशी असलेल्या राखीला अम्मानंच रजत सोबत सांभाळलं होतं. अम्मा स्वैपाक करताना राखी ओट्यावर बसून हादडत असे. रजत लोपाचा क्लासमेट. सात वर्षानी राखीहून मोठा. राखी घरी कमी आणि रजत बरोबर जास्त वाढली. अभ्यास ,गोष्टीची पुस्तकं त्याच्यासोबत वाचत असे.
त्यावेळच्या राखीच्या बोला फुलाला गाठ पडली. नात टिकलं नाही. राघवकाकासारखं युनिअन सांभाळेल, पक्ष वाढवेल वाटणाऱ्या रजतनं नवीन युनिट काढलं. पक्का भांडवलशहा झाला. जीवनशैली बदलली. मूळ स्वभाव तसाच राहिला. नवं नवं तत्वज्ञान मांडू लागला. पण त्यातला फोलपणा अम्मा दोन मिनिटात दाखवत असे. शिवाय दोघांच्या जॉइंट अकाउंट मधून न सांगता पैसे काढले जात होते. राखी वैतागत असे. रजतच्या धंद्याचे सुरवातीचे दिवस होते. मीता लहान होती. तिचं आजारपण, शाळेचे खर्चं आणि रजतच्या नव्या धंद्याचे खर्च याचा मेळ घालताना राखी शरीरानं, पैशानं आणि मनानंही थकत होती .रोज राखी आणि अम्माचं त्याच्याशी भांडण. धंद्यात जम बसू लागला तसा रजत या दोघीना  खर्चाचे तपशील न देता , घरची जबाबदारी न उचलता आपल्या अकाउंटला वेगळे पैसे शिल्लक टाकू लागला. अबोला वाढत गेला. कंपनीतल्या त्याच्याच वयाच्या  अकाऊंटस ऑफिसर गायत्रीबरोबर घसट वाढली. मीता अकरा वर्षाची असताना रजत आणि राखी वेगळे झाले. अशाच अम्मासोबत आर्थिक वादावादीनंतर तो अम्माच्या घरातून बाहेर पडला. दोन गल्ल्या सोडून पलिकडच्या तारा अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. रोज भेट व्हायची. हाय हॅलो होत होतं. पण अम्मा लांबच राहू लागली त्याच्यापासून. मीता दोन्ही घरी जायची. बाबाच्या दोन तीन मैत्रिणींची कौतुकं, भांडणं, हाणामारी वगैरेबद्दल तीच तर बातम्या आणायची.
मीता, राखीसारखी बुद्धिमान पण रजतची धरसोड वृत्ती आणि फटकळपणा होता. फटकळ कसली भांडकुदळ होती हे अम्माचं मत. अम्मा आणि मीताचा रोज वाद. समन्वयक म्हणून काम करताना राखी थकून जायची. तिचा थकलेला चेहरा बघून अम्माच रूममध्ये जावून बसायची. लेकीला चार वाजवाव्यात वाटायचं. तिचाही वाद व्हायचा लेकीशी.
'इथं त्रास होत असेल तर बाबाकडे जा!' दोघींनी सांगितलं. गेलीही राहायला. पण तिथंही बाबाशी वाद, भांडण.
रजतच्या आयुष्यात ठरल्यासारखी काही दिवसानी गायत्री आली, टिकली, त्याना एक मुलगी झाली. बाळंतपण राखी आणि अम्मानं केलं. नातेवाईक मित्रमंडळीत हा सगळा विस्मयाचा विषय होता. सवतींची भांडणं, कोर्टखटले ,वादावादी यातली काहीच मजा त्याना मिळाली नाही. गायत्रीशी मीताची त्यातल्या त्यात जवळीक. म्हणजे बेताचे वाद होते. अमृता तिची खूप लाडकी. बहिण म्हणून त्यांच्यात खास बाँड होता. गायत्रीची अमृता सातवीत असताना मीता एनएसडीत गेली. सगळे नको म्हणत असताना, शिकत असताना, लहान वयातच लग्न केलं. तेही वीस वर्षांनी मोठ्या प्रख्यात चित्रकार चारू बोसशी. खरंतर चारूही समजावत होता तिला कोर्स पूर्ण कर मग लग्नाचं बघू म्हणून. राखी, अम्मा, रजत तिघानी सर्वपरीनं समजावलं. शेवटी 'तू आणि तुझं नशीब!' म्हणत तिघानी नाद सोडला.

तसंच झालं.चारू मूडी आहे. पहिल्यासारखं चारू वेळ देत नाही.दोन दोन दिवस स्टुडिओमधेच राहतो. त्याच्यात हजबंड मटेरिअल कमी आहे .मूल कधी होणार मला? म्हणत दोन वर्षात सोडून दिला त्याला. डिवोर्स नाही, काही नाही. नेहमी प्रमाणं सगळ्याचं खापर आईवर. चारू आजही आला की अम्मा आणि राखीला भेटून जातो. हे तिला कळालं कि त्याचाही तिला राग येतो. भाषेमुळं चारू आणि राखीत एक खास बाँड. माँ चारूचंच ऐकते हे मीताच्या चिडचिडीचं एक कारण.
शेवटची पोळी तव्यात टाकतानाच फोन वाजला. मीताचा होता. काहीतरी मागणी असल्याशिवाय ती फोन करत नसे.

राखीनं गॅस बारीक केला आणि वादावादी होणार हे गृहित धरून कडक पोळी खायची तयारी ठेवली.
'मां, मला पैसे हवेत.'
'बाबाकडून घे. मला घराची दुरुस्ती करायचीय. आउट हाऊसचं प्लंबींग नवं करायचंय, जुने इलेक्ट्रिकल स्वीचेस बदलायचेत. मागच्या वर्षीच तुला एकदम लाखभर दिले. आता माझ्याकडे नाहीत.' राखी आवाज शक्यतो स्थिर ठेवत म्हणाली
'लाखभर रुपयाचं काय सांगतेस माँ! यावेळी मला बारा तेरा लाख हवेत. नवीन प्रोजेक्ट करतेय. लोन काढ. मी फेडीन. '
' तू बाबाला विचार.'
' कुठल्या तोंडानं विचारू? एक नवरा टिकवता आला नाही तुला. तू धड संसार केला असतास तर ही वेळच आली नसती माझ्यावर!'
'तू का नाही टिकवलास तुझा सोन्यासारखा नवरा?' राखीचा आवाज चढला. अम्मा बागेतला नळ बंद करून आत आली.फोन स्पीकरवर टाकायची खूण केली.
' तुझंच रक्त माझ्या अंगात. चुका झाल्यात तर तूच निस्तर. मला ताबडतोब बारा नाहीतर किमान दहा लाख तरी पाठव. 'मीताचा आवाज चढला.

' राखी, फोन बंद कर. ब्लॉक कर नंबर तिचा. ए पोरी, आजिबात फोन करायचा नाही आम्हाला. मी पोलिस कम्प्लेन करीन हं!' म्हणत अम्मानं फोन तिच्या हातून ओढून कट केला. राखी मटकन खुर्चीवर बसली. अम्मानं गॅस बंद केला. तव्यातली पोळी काळी कुळकुळीत झाली होती.
अम्मा बाजुच्या खुर्चीवर बसली. दोघी थोडावेळ काहीच बोलत नव्हत्या.

राखी, हे न संपणारं आहे सगळं ! पाठी येऊन छळीन पोटी येऊन छळीन. रजतचं छळणं संपलं तोवर ही तुझ्या राशीला लागली. '
' अम्मा, रजत खूपच बरा ग. इतकं छळलं नाही मला त्यानं. वाद व्हायचे. वैचारिक मतभेद होते. डिग्निटी होती त्याला. ही रजतशीही असंच टोचणारं बोलत असणार. '

' ते त्याचं तो बघून घेईल. आज युनिवर्सिटीत नॅक कमिटी येणार आहे ना! झाली का तुझी तयारी? तू जा अंघोळीला.'अम्मानं शिताफीनं विषय बदलला.

अम्मा विद्यापीठातून बाहेर पडली पण जाताना सुनेला डिपार्टमेंटला चिकटवला. राखीची नेट आणि पीएचडीही आपण असेपर्यंत पूर्ण करून घेतली. आज राखी प्रोफेसर आहे. तिची तुलना अम्माशी होते तेव्हा तिला खूप आनंद होतो.' नीरजा नायर मॅडमसारख्याच राखी मॅडमही आहेत,'
हे वाक्य कानात साठवून ठेवते राखी. अम्मासारखं होणं हे पद्मश्री, पद्मभूषण सारखं महत्वाचं वाटतं राखीला.

घरच्या कटकटीमुळं राखीनं विभागाध्यक्ष पद घेतलं नाही. फक्त शिकवत राहिली. आज सात मुलांना संशोधनासाठी मार्गदर्शन करतेय. सुट्टीच्या दिवशी अम्मासोबत सिनेमा बघायचा किंवा दोघी लाँग ड्राईववर जात. अम्मा नसती तर ? हा प्रश्न मनात आला कि राखी धास्तावायची. अम्माशिवाय जगणं ही कल्पनाच तिला सहन होत नसे. नकुशा पोरीचे लाड घरच्यापेक्षा अम्मानंच जास्त केले होते. अम्मानं घर बदलल्यावर दोघीना चुकल्यासारखं झालं होतं. आजही राखीला सासू जराही नजरेआड गेलेलं सोसत नाही.

'राखी, प्रशांतचा पन्नासावा वाढदिवस आहे. संध्याकाळी आपल्याला जायचंय बरं का त्याच्या घरी. सुषमाला जावून जेमतेम वर्ष झाल्यामुळं तो पन्नाशी साजरी करत नव्हता. लेकीनं गुपचुप घाट घातलाय.ती अमेरिकेला जातीय. त्याआधी बाबाची पन्नाशी सेलेब्रेट करायचीय तिला. तुला खास आमंत्रण दिलंय.'
अम्मा तिचं ताट वाढता वाढता म्हणाली.

प्रशांत, रजत-राखीचा ड्रामा ग्रूपचा मित्र. रजतनं कॉलेजमधे ज्युनिअर्सची  कितीतरी नाटकं डायरेक्ट केली. विलक्षण मंतरलेले दिवस होते ते. ते दिवस आठवले तरी राखी आजही अंतर्बाह्य मोहरून जाते. नाटकात प्रशांत हिरो होता.राखी प्रॉपर्टी सांभाळत असे. अभिनयाची आवड नव्हती पण नाटक तोंडपाठ होतं. आयत्यावेळी नायिकेचं काम करणारी मंजिरी दांड्या मारू लागली. रजतनं तिला काढलं आणि राखीला तिच्या मनाविरूद्ध उभं केलं. नाटक पाठ असणं आणि अभिनय या सुरुवातीच्या दोन वेगळ्या गोष्टी राखीच्याही नकळत एक झाल्या. स्पर्धेत नाटकाच्या वेळी शेवटच्या राखीच्या मोनोलॉगनंतर टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला आणि धावत येऊन रजतनं तिला अलगद  मिठीत घेतली.कौतुकानं पाठ थोपटली. आणि राखी अंतर्बाह्य बदलली.

या नव्या रजतनं तिचा ताबा घेतला. अर्थात ते सगळं क्षणिक होतं हे कळायला संसाराची बारा वर्षं जावी लागली. कुठलाही अनुभव सोसल्याशिवाय मिळतच नाही.
अंघोळ करून बाहेर येणारी राखी अम्माकडं रोखून बघू लागली. तशी अम्मा रस्सा पुन्हा गरम करायला उठली.

'अम्मा, मी थकलेय आता. नको नवीन लचांड माझ्या मागं लावू. आपण दोघी मजेत जगतोय ना ग!' राखी थांबत थांबत म्हणाली.

'मी किती दिवस पुरणार आहे तुला बाळा?' अम्मा पुटपुटली.

'अम्मा, माझं सोड.गायत्रीची तब्येत ठीक नसावी. कामत सरांनी परवा दोघाना टाटा मेमोरिअलला पाहिलं. फोन कर रजतला. विचार. अमू लहान आहे. कसं करत असतील ग सगळं! 'राखीनं शिताफीनं विषय बदलला.

'बघतील त्यांचं ते. तू नको पडू त्यांच्यात.राखी,प्रशांत आणि रजतमधे खूप फरक आहे. मला काळजी राहणार नाही.'
अम्मानं आपला मुद्दा दातात पकडून ठेवला होता.

' तू नको पडू त्यांच्यात' म्हणाली तरी अम्मा रजतला नक्की फोन करणार याची राखीला खात्री होती.

संध्याकाळी घरी आली तेव्हा गायत्री आणि रजत अम्माच्या खोलीत बसलेले दिसले. राखी अम्माच्या खोलीत डोकावत म्हणाली, तुम्ही दोघं चहा घेणार का? मी बनवतेय अम्मासाठी आणि माझ्यासाठी.

उत्तर न ऐकताच ती किचनमधे चौघांना चहा बनवायला लागली. पाठोपाठ गायत्री किचनमधे आली. खूप खंगली होती. अमूचा ड्रेस घातला होता.तोही डगळा होत होता. सगळीकडून हाडं दिसत होती. चेहरा ओढल्यासारखा झाला होता. अम्मा तिच्यासमोर तरुण वाटावी.
'किती नीटनेटकी छान राहायची ही!  काय अवतार झालाय हिचा.' राखी मनात म्हणत होती.

'काही खायला करू का ग?' राखीनं विचारलं. तिनं मानेनंच नको म्हणून सांगितलं.

'अमूचा अभ्यास काय म्हणतो?' राखी तिच्या तब्येतीचं विचारणं शक्यतो टाळत होती.
'करत असावी व्यवस्थित.' गायत्रीचं तुटक उत्तर.

चहा कपात गाळायला घेतला. शांतता राखीला असह्य झाली. तिनं ट्रे टेबलावर ठेवला. आणि गायत्रीच्या बाजूला बसली. तिच्या पाठीवर हात ठेवला.

'डॉक्टर काय म्हणतात? '
' युटेरस ...लास्ट स्टेज… रजत एकदम खचून गेलाय राखी…. अमूला कळालंय सगळं.. अमूपेक्षा रजतची काळजी वाटते…. अमुच्याही  बारावीची सुरुवात झालीय. आणि हे असं....'

गायत्रीला हुंदका फुटला. जणू पुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं गायत्रीनं एका दमात दिली. राखीला आधीच अंदाज आलेला होता. वय वाढल्यावरचं बाळंतपण, ओटीपोट दुखतं अशा तिच्या तक्रारी बऱ्याच वर्षापासून रजतकडून ती ऐकत होती. नुसती पेन किलर नको घेऊ. नीट दाखवून घ्या. तपासून घ्या सगळं! असा सल्ला अम्मानंही दिला होता. रजतचा व्याप आणि गायत्रीचं दुर्लक्ष यात गोष्टी या थराला गेल्या. आता पेन किलरही निकामी झाल्या.

'जगण्याची प्रबळ आशा आणि कारणं असणाऱ्या माणसाला असं क्षणोक्षणी डोळ्यासमोर मरण नको रे देवा!' राखी  तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

सावकाश उठत गायत्री बागेतल्या झोपाळ्यावर जाऊन बसली.

राखीच्या रूममध्ये रजत आला. किती थकल्यासारखा दिसतो हा. पंचावन्न छपन्न थकायचं वय नाही. कोणता न तुटणारा क्षीण धागा अजून शिल्लक आहे तेच राखीला कळत नव्हतं.
' अमुची काळजी नको करू रजत. फक्त गायत्रीकडं नीट लक्ष दे.'त्याचा हात हातात घेऊन म्हणावं वाटलं राखीला.

'राखी, मीतूची काळजी करू नको. मी देतो तिला पैसे. काय करायचंय करू देत तिला!' कॉटच्या बाजुच्या खुर्चीवर बसत रजत म्हणाला.

'ग्रेट रजत, इथं गायत्रीकडं बघवत नाही मला आणि तू मीतूचा काय विचार करतोस? 'राखीचा दबका स्वरही धारदार झाला.

'नको करू? मी तिचा बाप आहे. ती अशी का झाली विचार करतो तेव्हा चार बोटं माझ्याकडं वळतात. तिच्या अडनिड्या वयात मी घर सोडलं. कुणावर चिडावं हे न कळणारं वय होतं तिचं…'रजत बोलता बोलता थांबला.

' समोर तुम्ही दोघी होता. तुमच्यावर चिडायची सवय लागली तिला. माझ्याशी बोलतही नाही ती. अलिकडं अमृताशीही बोलली नाहीय. तिचे फोनच उचलत नाही ती. राखी, मला भयानक स्वप्नं पडतात. तिनं झोपेच्या गोळ्या घेतल्यात. पांढऱ्या चादरीत माझी मीतू! '
रजतचा गळा दाटून आला.
राखी बघतच राहिली. कुठं गेला याचा स्वार्थी स्वभाव, बिलंदरपणा? इतकं हळवं व्हावं यानं! पुरुषांनाही बायकांसारखा मेनोपॉज असतो कि काय? राखीच्या मनात विचार आणि हसू पाठोपाठ आलं. रजत आपल्याच तंद्रीत बोलत होता.

' तुम्ही दोघीही बोलत जा ग अधून मधून तिच्याशी. रिलॅक्स व्हायला ये म्हणावं इकडं. ती हळवी आहे खूप. जपायला हवं तिला.'

राखीला वाटलं आपण का बरं याच्यासारखा विचार नाही केला? गायत्रीसोबत मृत्युच्या छायेत याचा दिवस जातोय. म्हणूनच कदाचित उगीच हळवा झालाय मीतूबद्दल. असंही जन्मापासून मीतुचं सगळं अम्मानंच केलं. रजतशी लहान असताना मीतूची मस्ती चालायची तेवढीच काय ती. नंतर दोघांचे वादच व्हायचे. नेहमीचे सण, मीतूचा वाढदिवस वगैरे अम्माच लक्षात ठेवून साजरा करायची. तिचा अभ्यास ,तिचे छंद, तिच्याबरोबर खेळणं, तिचं वाचन याकडं अम्माच लक्ष पुरवायची. मीतू कशी घडली याचं उत्तर रजत किंवा राखी दोघांजवळ नव्हतं.
दरम्यान मीतूचा फोन आला. गायत्रीबद्दल कळालं तिला. फोनवरच रडत होती. मला पैसे नकोत पण मम्मीचा इलाज करा म्हणाली. अमूबद्दल खूपच हळहळत होती.

'इलाजापलिकडं गेलंय सगळं. आता वाट बघायची ती वेदनेतून मुक्त व्हायची.' म्हटल्यावर 'माँ, नको ना ग असं बोलूस!' म्हणताना तिला हुंदका फुटला.

नंतरच्या दोन दिवसातच मीतू आली. चिकार रडारड, सॉरी झालं. सगळ्याना कडकडून भेटली. अमूला फिल्म फेस्टिवलला घेऊन गेली.
बाबानं तिला प्रेमानं जवळ घेऊन सांगितलं.' तुला जे हवंय ते कर. मी आहे तुझ्यासोबत.'

मग पुन्हा रडारड, सॉरी. जाताना बाबानं नको नको म्हणत असताना अकाऊंटला ट्रान्स्फर केलेले पैसे घेऊन, नवीन प्रोजेक्टवर काम करायला गेली. जाताना 'चारूला उगीच सोडलं' म्हणून रड रड रडली. अम्मानं कपाळाला हात लावला.

राखी कशातच नव्हती. तरीही माघारी जाताना मीतूला राखी जवळ घेऊन म्हणाली,
'तुला हवं ते कर. चांगला पार्टनर शोध. धरसोड वृत्ती सोड. येत जा अधून मधून घरी. अम्मा, बाबा, मी सगळेच थकलोय. अमूला फोन कर. एकटी पडलीय. आपल्यात तुटलेपण नकोय आता.'

राखीचा समजावणीचा सूर
'माँ, मला चारूची खूप आठवण येते ग!' ती गळ्यात पडून हमसून रडायला लागली.

आधी स्वतःच त्याच्या गळ्यात पडली, मग त्याला सोडला आणि आता परत हे ..! काय करावं या पोरीचं!
' तू सांगितलंस का तसं त्याला? 'राखीनं विचारताच होकारार्थी मान हलवत हसली.

'ये परत भूतनी, असं म्हणतो तो!'तिच्या चेहऱ्यावर उदास हसू होतं.
राखीला कळून चुकलं कशीही असली तरी पोटचा गोळा आहे. जवळ घ्यावाच लागेल. तिच्या आणि चारूच्या नात्याबद्दल जेव्हा राखी अम्माशी चर्चा करत असे तेव्हा अम्मा या नात्याला भावनिक प्रेम म्हणत असे. दोन अपूर्ण माणसांचा संसार आहे तो असं तिला वाटे.

'तिला काय करायचंय ते करू दे. हे तिचं आयुष्य आहे .' असं अम्मा वारंवार राखीला सांगत असे. राखी मात्र मीतू आणि चारूच्या नात्यातल्या नेमक्या गुंतलेल्या धाग्याचा विचार करत राहायची. चारूबद्दल बंगाली म्हणून तिला विशेष ममत्व होतं. समंजस, प्रेमळ होता तो. राखीपेक्षा पाचेक वर्षानी लहान होता. एवढा मोठा चित्रकार पण पुण्यात प्रदर्शनासाठी आला की हॉटेलात न उतरता घरीच उतरायचा.अम्मा, राखी आणि त्याच्या गप्पा रंगायच्या.

                               2

ल्ली राखीला घरी दारी सगळीकडेच अस्वस्थ वाटत होतं. घरी रजत, अमृताच्या चेहऱ्यावरची उदासी छळत होती. मरणाला सामोरी जाणारी गायत्री दर दिवशी केविलवाणी, भेसूर दिसत होती. वेदना सहन होत नव्हती. ओरडायची. डोकं आपटायची. रजतला असह्य व्हायचं. गायत्रीत इतका गुंतला होता, त्यांचं समृद्ध सहजीवन पाहून पूर्वी राखीला हेवा वाटायचा. हल्ली उदास वाटत होतं तिलाही. पुरुषासारखा पुरूष पण हल्ली रजत अम्मा जवळ येऊन रडायचा. अबोल अम्माचे भकास डोळे बघून गायत्रीला खूप वाईट वाटत असे. किती दुःख पचवायचं अम्मानं तरी!

अमृताला परीक्षेला अम्माच सोडून येत होती. पूर्वी युनिवर्सिटीत अम्मा ये जा करायची. युपीएससी कोचिंग क्लासमधे राज्यशास्त्राची लेक्चर्स घ्यायची. पार्टी मिटिंग्जना जायची. गेली दोन चार वर्षं सगळंच थांबवलंय तिनं. राखीला भिती वाटायची ही हळूहळू सगळ्यातून विरक्त होतेय की काय!

रजत गायत्री हॉस्पीटलच्या वाऱ्या करत होते. अमृता तिच्याकडेच राहात होती. नको म्हटलं तरी कामात मदत करायची. अम्माच्या अवतीभवती राहायची. रात्री अम्माच्या रूममध्ये झोपायची. आता घरी गेलीय. पण दररोज संध्याकाळी इकडे येते. घरी गेल्यावर हल्ली चहा तिच्याच हातचा मिळतो. पोरीनं सगळं समजुतदारपणे स्वीकारलं.

मीता चारूकडे पुन्हा गेली. चारू दोन वर्षासाठी एका प्रोजेक्टच्या निमित्तानं पॅरीसला गेला. मीताही एका फ्रेंच थिएटर ग्रूप प्रोजेक्टवर काम काढून सोबत गेली हे विशेष.

विद्यापीठातही फारसं उत्साहवर्धक काहीच घडत नव्हतं. तिचे दोनतीन विद्यार्थी सोडले तर कुणाचं काम पुढं सरकत नव्हतं. आवारात शिरलं की मोर्चे, आंदोलनं, धरणं, दंगे हेच बघावं लागत होतं. कालच तिच्या डिपार्टमेंटच्या एमएच्या एका हुषार विद्यार्थ्यानं विद्यावेतन बंद झालं म्हणून हॉस्टेलमध्ये विष घेऊन आत्महत्या केली.आणि स्टाफरूममधे सातव्या वेतन आयोगाची चर्चा. सगळा आनंद आहे ! विसंगतीतच जगावं लागत होतं!

राखी कोणत्याही चळवळीत, भाषणबाजीत उतरत नसे. आपलं काम भलं आपण भलं. वाचन, लेखन, अम्माशी चर्चा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, एमए, एमफिलचे वर्ग घेणं. रिसर्च पेपर लिहिणं, सगळं यंत्रवत आयुष्य. पण कालच्या मंगळवेढ्याच्या रवीच्या आत्महत्येनं मन ढवळून निघालं. कुणी म्हणे रवीकडं पैसे नव्हते. गावी जाऊन रोजगाराचं काम करायचं नव्हतं. वडील उसतोडणीवर जाताना ट्रेलरवरून तोल जावून डोक्यावर पडले आणि गेले. आई बहीण उघड्यावर आल्या. कुणी म्हणे त्याचं सफाईच्या तक्रारीवरून वॉर्डनशी भांडण झालं तर नक्षलवाद्यांशी संबंध आहेत म्हणून पोलिसानी उचललं. त्यामुळं आत्महत्या केली. तर कुणी म्हणे प्रेमप्रकरण असावं. एक दोनदा गर्ल्स हॉस्टेलसमोर पोरीबरोबर बोलताना रेक्टरनं झापलं होतं.खरं खोट तोच जाणे. एक जीव अकाली गेला. एक अध्याय संपला.

डिपार्टमेंटमधे शिरताना सहज तिचं लक्ष बाजुच्या हिरवळीकडं गेलं. तिथं कोपऱ्यात नेहमी तिच्या डिपार्टमेंटची एकदोन पोरं कँटिनवाल्या मामांच्या डब्याची वाट पहात असायची. आज कोणीच दिसत नव्हतं. गेटवर मामाच भेटले. राखीनं विचारलं,
'काय मामा , आज डबे दिसत नाहीत?'

'मॅडम, पोरांचे पैसे बंद झाले आणि माझे डबे. गरीब पोरं कुठून कुठून येऊन शिकत होती. तेवढाच त्याना आणि मलाही आधार होता. तुमचीच दहा बारा पोरं होती. आता चारच आहेत.' डबे खाली ठेवत मामा म्हणाले.

'दोन वेळच्या जेवणाचे किती द्यायची हो पोरं?' राखीनं तिथंच थांबून सहज विचारलं.

' लोणचं, आठवड्यातनं एक दोन दिवस लोणच्याऐवजी पापड ,वाटीभर भात, फोडणीची डाळ, तीन चपाती, सुकी भाजी एवढं एकावेळी तीस रूपये. यातही मॅडम अॅडजस्ट करून दोन पोरं जेवायची. एक सकाळी चपाती खायचा, दूसरा रात्री. मलाच पोटात कालवायचं हो!'
मामा सुन्नपणे म्हणाले.

राखी केबिनमधे आली. तिला मीताची दहा लाख तरी दे, लोन काढ, गर्जनेची आठवण झाली. इंडिया आणि भारत आहेच. ती कुठल्याच विचारधारेची नव्हती. पण आज तिला पै न पै चा विचार करणाऱ्या, गरजवंताना पैसे विनाअट वाटून टाकणाऱ्या अम्माचा विचार खरा वाटत होता.
माणसाचे स्तर वेगळे, समस्या वेगळ्या, पण घालमेल, वेदनेची झळ, दाह सारखाच.
'मॅडम, दोन मिनिटं केबिनमधे येता?'
विभागाध्यक्ष आनंद साठे सर तिच्या टेबलाजवळ उभे होते. कधीही सरानी शिपायामार्फत तिला बोलावलं नाही .स्वतः येऊन सांगायचे. साठे सर राखीचे पीएचडीचे विद्यार्थी. राखीनं विभागाध्यक्ष पद नाकारलं आणि अनेकाना मागं सारून साठे सर विभागाध्यक्ष झाले. साठे आडनावावरून जातीची अटकळ आणि विसंगत वास्तव याची खवचटपणे चर्चा चाले. गुणवत्ता पुरेपूर असूनही स्टाफरूममधे त्यांच्या जातीची, राखीच्या वशील्याची चर्चा व्हायची तेव्हा राखीची प्रचंड चिडचिड व्हायची.

केबिनमधे बसताच तिला सरानी रवीशी झालेल्या पंधरा दिवसापुर्वीच्या  संभाषणाचा तपशील  ऐकवला. तिला धक्काच बसला .बाहेर त्याच्या आत्महत्येची इतकी कारणं ऐकली त्यात अजून एक भर .रवी हुषार होता. एम.ए. ला गोल्ड मेडलसाठी  धडपडत होता.त्याला पेपर तपासणीत जाणून बुजून  स्टाफनं तिसरा ठेवला. तिच्या
Fundamentals विषयात तोच टॉपर होता. त्यानं दिलेली उदाहरणं ,विश्लेषण अप्रतिम , वास्तववादी तरीही नाविन्यपूर्ण होतं. बाकीच्या स्टाफनी जाणून बुजून त्याला तिसरा ठेवला. खरंतर त्याची मांडणी सर्व पेपरमधे चोख होती. मातृभाषेतल्या शिक्षणाचा प्रभाव हस्ताक्षरात जाणवत होता इतकंच. पण नवीन काहीही नसूनही फक्त भाषा आणि प्रेझेंटेशनच्या जोरावर उरलेले दोघे वरचढ ठरले. मूळात शिक्षकानी  प्रेझेंटेशन इतकंच ज्ञान ही तपासायचं असतं.  रवी मंगऴवेढ्याच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून इतका पुढं आला याचं कौतुक फक्त राखी आणि सरानाच होतं. स्टाफरूमच्या चर्चा  राखी नेहमीच ऐकत असे. मनात म्हणतही असे उदात्त पेशा असला तरी उदात्त विचार असतातच असं नाही .

रवी पहिला येणं शक्यच नव्हतं. तिची सरांशी हॉस्टेल, विद्यार्थ्यांचा स्टायपेंड या विषयावरही चर्चा झाली. सगळं निराशाजनक होतं. तिच्या डोक्यात विचार सुरू झाले. अम्माचा सल्ला घेतला पाहिजे .

'हे असं काठावर राहून बघत राहणं नाही चालणार .आता यात उतरावंच लागेल!' म्हणत राखी घरी आली.

                                     3

रीआल्यावर तिच्या चेहऱ्यावरूनच काहीतरी बिनसलंय हे अम्मानं ओळखलं. चहा घेता घेता तिनं विद्यापीठातल्या घडामोडी सांगितल्या. अम्मा शांत होती. राखीला अम्माकडून समस्येवर भाष्य हवं होतं. अम्मा काहीच बोलत नाही हे पाहिल्यावर राखीनंच प्रश्न केला .
अम्मा, आपण काही करू शकतो का?
म्हटलं तर खूप काही आणि नाही म्हटलं तर काहीच नाही अम्मानं तुटक उत्तर दिलं.
राखी ताडकन उठून तिच्या रूममधे गेली. डोकं भणभणायला लागलं. अम्माचाही राग येऊ लागला.
अम्मा पाठोपाठ रूममधे आली. तिच्या शेजारी खुर्चीवर बसत म्हणाली, तुला ही समस्या नेमकी कशी सोडवायचीय राखी . समाजवादी ,सर्वोदयी,कम्युनिष्ट पद्धतीनं कि अन्य कोणत्या पद्धतीनं ?

अन्य कोणती पद्धत म्हणजे कोणती हे आता राखीला चांगलंच माहीत होतं. हाडाची कम्युनिष्ट अम्मा स्वतःच्या विचारधारेतल्या तृटीही बेधडक सांगायची. ती संघाचं थेट नाव घेत नसे. अम्मा वेगवेगळ्या विचारधारेवरच्या चर्चा नेहमी करायची. तिच्या मते समाजवादी पद्धत म्हणजे उत्तम पेपरवर्क, प्रेझेंटेशन.  पण ऑल लीडर्स नो फॉलोअर्स. सर्वोदयी पद्धत म्हणजे मुकाट्यानं न बोलता काम करत राहणं. थेट घाणीत हात घालणं पण पुढची फळी तयार करण्यात अनास्था. स्वयंस्फुर्तीने कार्यकर्ते यावेत ही अपेक्षा. कम्युनिष्ट पद्धत म्हणजे धडामकन उतरणं. दोन माणसातला फरक लक्षात न घेता सरधोपट पद्धतीनं समस्या हाताळणं आणि इतर पद्धत म्हणजे त्यांच्यातूनच समन्वयक घडवत मूळ समस्या सोडवतानाच आपला छुपा अजेंडा माथी मारणं.

'हे बघ राखी,आउट हाऊसमधे पाच एकजण ठेवू शकतो. शक्यतो मुलीच.जेवणाचीही व्यवस्था करता येईल दोन वेळच्या. शिधा देऊ .त्यानाच शिजवावं लागेल .त्याना आजच्या जगात जगण्यासाठी तयार ही करता येईल. पण सगळं आयतं नाही देऊ शकत .त्यानाही मेहनत करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्यांचे भाग्यविधाते नाही. त्यामुळं फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत . आणि त्याना गृहितही धरता येणार नाही. बघ कसं करता येईल ते. शिवाय तुझी स्वच्छतेची इंद्रियं आणि एकंदर स्वभाव बघता तू नीट विचार कर .तुझी घाणीची इंद्रियं नको इतकी तीव्र आहेत . तुलाही बदलावं लागेल .'

सलग बोलल्यामुळे अम्माला दम लागला. पाणी द्यायला राखी उठली . कानात अम्माचं स्वच्छतेची इंद्रियं  घण घातल्यासारखं वाजत होतं. जुनी काळजात रुतलेली आठवण वर वर येऊ लागली.

पाणी देता देता राखी थबकली.तेवढ्यात राखीचा फोन वाजला . भरलेला ग्लास अम्माच्या हातात देत तिनं फोन उचलला.रजतचा होता.
गायत्री दहा मिनिटापूर्वी गेली. आता रात्र झालीय . फॉर्मॅलिटी पूर्ण करून मी आणि अमृता सकाळी गायत्रीला घरी घेऊन येतोय. तिचं सगळं विधीवत शास्त्रानुसार करायचंय मला. ती एकदा बोलताना तसं म्हणाली होती. बोलता बोलता रजत थांबला, आवंढा गिळत म्हणाला,
काय काय तयारी लागेल अमुच्या मोबाईलवर कळव म्हणावं अम्माला. आणि हो अम्माला विचार तिकडे आणू कि तारा अपार्टमेंटमधे नेऊ बॉडी.... सॉरी गायत्रीला ?रजतचा आवाज बदलला. गायत्रीला बॉडी म्हणताना किती यातना होत होत्या रजतला.

किती जीवघेणा प्रश्न विचारला रजतनं? राखीला हुंदका फुटला. फोन अम्माकडं दिला. रजतचं विश्वच उध्वस्त झालं होतं. गायत्री आणि रजत केवढा खास बंध होता. समृद्ध सहजीवन होतं त्यांचं. मी त्याच्या आयुष्यात आधी आले नसते तर आज इथं गायत्री असती. आणि तिला तारा अपार्टमेंटमधे न्यायचं की इथं आणायचं प्रश्नच उरला नसता. राखीला अश्रू अनावर झाले.

'इथेच या' असं फोनवर सांगून अम्मानं फोन ठेवला. देवघरात गेली. थोड्याच वेळात देवघरातून अम्माचा टीपेचा पण थरथरता आवाज ऐकू येऊ लागला.

भगव्दगीता किंचिद्धीता
गंगा जल लव कणिका पीता
सकृदपियस्य मुरारीसमर्चाम्
तस्य यमः किं कुरुते चर्चाम्

राखी स्वतःला सावरत उठली.आणि फोनवर नातेवाईकाना कळवायला सुरूवात केली. दोघी रात्रभर खुर्चीवरच बसून राहिल्या.
पहाटे अम्मानं राघवकाकाच्या खोलीतून विणलेली  बाज काढून अंगणात आणली. भराभर फोन करून सवाष्णीचीं लेणी आणवली. सुगंधी आयुर्वेदिक वनस्पती पोटमाळ्यावरच्या पिशवीतून काढल्या आणि परसातल्या तांब्याच्या बंबात पाणी आणि वनस्पती टाकून ढलप्या ,बंबगोळ्यानी बंब पेटवला. सुरवातीचा धूर जाऊन आता बंब व्यवस्थित पेटला. संथपणे तापत राहिलं पाणी. वनस्पतींचा सुगंधी पण तीव्र गंध वातावरणात भरला.
सगळं अम्मा एकटी करत होती. राखीला कानकोंडं झाल्यासारखं झालं.अपराधी भावना दाटली. तीच दाबून काळजात झाकलेली जुनी आठवण अनेकपदरी आवरणं फाडत वर आली…..
अमू दहावीत असताना गायत्री खूप आजारी होती म्हणून तारा अपार्टमेंटमधे बघायला गेलेल्या अम्मानं तिला, रजतला आणि अमृताला घरी आणलं . गायत्रीला मीतूच्या रूममधे ठेवलं . दोघींच्या घरात अचानक तीन माणसं वाढली. गायत्रीच्या अंगभर पसरलेली दुर्गंधी हळूहळू घरभर वाढली. राखीची चिडचिड, तिरस्कार ,रूममधे स्वतःला बंद करून घेणं अम्माला दिसत होतं. राखी जेवणासाठीही रूमबाहेर आली नाही. अमृता केविलवाणी झाली. रजत ही गप्पगप्प झाला. तिला पुन्हा तारा अपार्टमेंटमधे न्यावं अशी बाप लेकीची कुजबुज सुरू झाली आणि अम्मा राखीच्या रूममधे संतापानं शिरली .
राखीसमोर उभी राहिली .तिला विचारलं 'राखी,नक्की त्रास कसला होतोय तुला? दुर्गंधीचा? सवत आजारी पडून इथं आलीय याचा कि तुझ्याशिवाय सर्वजण तिची इतकी काळजी घेतायत, जपतायत तिला याचा?
राखीला हा हल्ला अनपेक्षित होता. तिलाही नक्की कळत नव्हतं कशामुळे चिडचिड होतेय ते.
उद्या माझ्यावर, तुझ्यावरही अशी वेळ येऊ शकते. आपल्यापैकी कुणाचीही अशी अवस्था होऊ शकते . माझीच झाली तर तू काय करणार ग बाई माझं ? राखी, माझ्या माघारी तुझं तरी कोण करणार ग?

अम्मा खुर्चीवर बसली . दीर्घ श्वास घेतला. आणि बोलू लागली.
दुर्गंध म्हणजे तरी काय ग ! एक वेगळा रंग ,गंध ,द्रव एवढंच. लहान लेकराना बघ कधीतरी. त्याना कशाचाच फरक पडत नाही. सगळं सारखंच त्याना. माणसाचं मन निर्मळ असावं ग. राखी, सोड ही कोती वृत्ती. ही दळभद्री वृत्ती आपल्या मुक्तीची वाट बिकट करते ग ! अम्माचा कंठ दाटला.
ती जाणार आहे. राहणार नाही ती . आज जाईल किंवा वर्ष दोन वर्षात जाईल पण मरण अटळ आहे तिचं. तिचं जाणं मला सुसह्य करू दे बाई. तू हवं तर युनिवर्सिटी गेस्टहाऊसवर जा रहायला किंवा क्वार्टर्स घे. सहज मिळेल तुला.; दबक्या पण टोकदार आवाजात म्हणत धाडकन दार ओढून अम्मा तरातरा बाहेर निघून गेली.
पहिल्यांदा अम्माचा हा पावित्रा बघून राखी हादरली. एका क्षणात भानावर आली. दार उघडून बाहेर आली.
अम्मानं गायत्रीला स्वच्छ सुगंधी तेलानी मालीश करून तिच्या साठवणीतल्या आयुर्वेदीक वनस्पतीनी उकळलेल्या पाण्यानी अंघोळ घातली. तिचं अंग मऊ सुती साडीनं स्वच्छ पुसून,अंगभर पावडर टाकून  हलका गाऊन चढवला. घरभर धूप फिरवला.वातावरण एकदम  बदललं. स्वतः तिच्या जवळ बसून अम्मानं तिला मुगाचं कढण चमच्यानं पाजलं. राखी सगळं मुकाटपणे बघत होती.
त्यारात्री राखीला इतकं अपराधी वाटत होतं. झोप येत नव्हती. आपलं खरंच खूप चुकलं याची जाणीव सारखी होत होती. गायत्रीच्या मरणाचं राखीला भय वाटू लागलं.
त्या रात्री एकच्या सुमारास ती जागी झाली . खिडकीतून पाहिलं. पंपरूमजवळच्या आंब्याच्या झाडाभोवती बांधलेल्या पारावर अमृता आणि रजत बसले होते. वातावरण शांत होतं.वाऱ्यासोबत पानांची सळसळ होत होती. चांदणं होतं .पंपरूम बाहेरच्या बल्बचा प्रकाश अमृताच्या चेहऱ्यावर पडला होता. रजतच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडत होती. रजत तिला थोपटत होता. समजूत काढत होता. राखीला असह्य झालं. माणूस म्हणून स्वतःची लाज वाटू लागली. काय केलं मी हे! असा विचार मनात तीव्रपणे उफाळला. ती तिथं गेली.रजत, अमृताच्या पायाजवळच्या दगडावर जाऊन बसली. तिचे डोळे भरले .' सॉरी रजत ,सॉरी ग अमू!' एवढंच भरलेल्या गळ्यातून फुटलं. रजतनं अमृतासारखंच तिच्याही डोक्यावर हात ठेवून तिला थोपटलं.
राखी त्या आठवणीतून बाहेर आली.अम्माजवळ गेली.अम्माला विचारलं काय काय आणि कसं कसं करायचं ते. हाताला धरून अम्माला खुर्चीवर बसवलं आणि तिच्या पायाशी बसत अम्माला म्हणाली, अम्मा, मी एकदा चुकले.परत परत तीच चूक नाही करणार .देहाची घृणा मी कधीचनाही करणार. प्रॉमिज अम्मा .फक्त मला एक संधी दे प्लीज !  अम्मानं थरथरत्या ,सुरकुतलेल्या हातानं राखीच्या दोन्ही गालावरून हात फिरवले आल्याबल्या केलं आणि उदास हसली.
बंबगोळे आणायला आत जाताना तोंडानं सुरूच होतं तिचं
पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननी जठरेशयनं
इहं संसारे खलु दुस्तारे
कृपयापारे पाहि मुरारे

आठच्या सुमारास अँब्युलन्समधून गायत्रीला आणलं. रजतच्या युनिटचे लोक, तारा अपार्टमेंट मधले शेजारी, गायत्रीचे जवळचे एकदोन जण जमले. बाजल्यावर मऊ दुपटं टाकून गायत्रीला त्यावर ठेवलं. अम्मा सांगेल तशी राखीनं गायत्रीला अंघोळ घातली.अंग केस कोरडे करून वेणी घातली,गजरा माळला,साडी नेसवली, सौभाग्य लेणी घालून  करून सगळा साजशृंगार केला. चालता बोलता देह निर्जीव, थंडगार, कडक झाला होता. राखीचा हात थरथरू लागला. तिचं अंघोळ घालणं, सजवणं या सगळ्याच्या पल्याड गेली होती गायत्री. समजुतदार जीव. कायमच तिनं राखी समोर दुय्यमत्व समजुतदारपणे स्वीकारलं होतं. तिच्या नजरेत अम्मा, राखीबद्दल स्नेह, कौतुक, कृतज्ञता असायची. राखीला आतून भरून येत होतं. ही सेवा, गायत्री श्वास घेत असताना, जिवंत असताना करण्याची तिला परमेश्वरानं संधी दिली होती. ती गमावल्याची बोच दाटून आली. राखीला हुंदका फुटला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच ती इतकं हंबरडा फोडून रडत होती. आपल्या कोशातून बाहेर येत होती. आत दाटलेलं सगळं बाहेर येत होतं.

अनावर राखीला सावरायला रजत पुढं येत होता. अम्मानं त्याला थांब अशी खूण करत अडवलं. अमृता धावत येऊन राखीला बिलगून रडू लागली. राखीला अजूनच रडू फुटलं. तिनं अमृताला कुशीत घेतलं. ती अम्माकडं बघत भरलेल्या आवाजात रडतच  म्हणाली,
अम्मा , गायत्रीला मला माफ करायला सांग. अमूची काळजी करू नको म्हणून सांग . तुझं ऐकेल ती.

ऐक ग पोरी, अमू, रजत कुणाचीच काळजी करू नको. शांत हो. मुक्त हो पिंडातून ; अम्मा थरथरत्या हळू आवाजात गायत्रीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. पण वातावरणात तिचा हळू थरथरता आवाज घुमला. झाडावरच्या पक्षानी एकच कलकलाट सुरू केला.
राम नाम सत्य है!म्हणत गायत्रीला उचललं . अँब्युलन्स गेली .वातावरणात अम्माच्या भजगोविंदम् मूढमतेचा घोष गुंजत राहिला.

राखीला आपल्यात अंतर्बाह्य काहीतरी बदलून गेलंय याची जाणीव झाली. घृणा, अहंकार, अलिप्तता,भय एक एक पदर गळून पडले होते. नवा जन्म झाल्यासारखं वाटत होतं. बिलगलेल्या अमृताला जवळ घेऊन थोपटताना मन एकदम हलकं झालं. तीही अम्मासोबत हळूवार आवाजात गुणगुणू लागली भज गोविन्दम् मूढमत

स्वाती ठकार
(कथा 2019 च्या चिंतन आदेश दिवाळी अंकात प्रकाशित.)


परिक्रमा

 

परिक्रमा
विक्रम
१.
एका बाजुला धो धो कोसऴणारं पाणी, वर काळ्या करड्या ढगानी गच्च आकाश आणि दूसऱ्या बाजुला घुप्प धुकं. हिरव्या चिंब झाडानी अजून कुंदपणा वाढला आहे. या सह्याद्रीच्या रांगात पावसाळ्यात फिरणं म्हणजे खरी मजा. सहज मागं वळून पाहिलं. लांब टेकडीवर अंगणातली उंच नारळाची झाडं आणि त्यात लपलेलं माझं कॉटेज दिसत होतं. कुठल्या तंद्रीत चालत होतो मी ! नागमोडी वाट चालत जवळ जवळ तीन चार किलोमीटर लांब आलो तरी कळालं नाही. समोर मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरच्या पळणाऱ्या गाड्या दिसतायत आता. घराबाहेर पडलो तेव्हा पायाला कोकचा रिकामा कॅन लागला आणि एकाद्या लहान मुलासारखा पायानं टोलवत पुढं पुढं निघालो खरा.

मी आणि माया किती लांबपर्यंत दगड टोलवत जायचो .
अगदी घर ते समोरची पमामावशीची ऑईलमिल असो
कि मैलभर लांब असलेली शाळा
दगड नव्हे तर काळालाच पुढं पुढं टोलवतोय दोघं .
तसं तर धावतोय दोघं पण
माझा काळ अचानक तिथंच थांबलाय

खूप काही विसरायचंय मला पण माया मात्र आठवत राहते.
या चिंचोळ्या रस्त्यावर तशी वाहतुक कमीच. हल्ली या बाजुला छोटा का होईना काँक्रीटचा रस्ता तरी झालाय. पाच सहा वर्षापूर्वी पर्यंत मातीची पायवाटच होती. डोंगरात, झाडीत लपलेला एखाद दूसरा बंगला होता .लोणावळा हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध काय झालं. आणि गर्दी वाढत चालली.
समोर पाच सहा कॉलेजची मुलं खिदळत चालली आहेत.

माझ्या नैनाच्या वयाची किंवा जरा लहान असतील. कशी दिसत असेल नैना आता? शेवटचं निवांत भेटलो, पंधरा दिवस राहिलो ते पमामावशी गेली तेव्हा. नववीत होती नैना. माया आणि नैना दोघीना भेटून सगळं आवरून मगच मुंबईला गेलो. स्वतंत्र बेटांसारखं जगतोय आम्ही तिघं! म्हणायला नवरा, बायको. मुलगी अशी नावं आहेत या बेटांना. अधून मधून जायचो कधी चार तास तर कधी रात्रभरासाठी. मायाला कडकडून मिठी मारली कि सगळा शीण दूर व्हायचा.

‘पैसे हवेत का?’ विचारलं की म्हणायची ‘दे एक दहा पंधरा करोड!’ आणि छान हसायची.उलट मलाच लागणार आहेत का पैसे? विचारायची. कोमल गंधार, परिक्रमा, बरगद की बातें यात गेली चार पाच वर्षं जाताच आलं नाही तिकडं.

राजन काकाचे घरात होते नव्हते ते सगळे कॅमेरे माझ्या स्वाधीन करून पमामावशी म्हणाली, ”तुला मुंबईला जायचंय ना विक्रम! जा बाबा. तुझ्या काकाच्या माहितीतले दोन तीन जण आहेत या लाईनमधले चेंबूर, उल्हासनगरला. ते करतील लागली तर मदत तुला. फोटोग्राफी, फिल्मलाईन जे काय करायचं ते कर पण असा घरात कुढत राहू नको. कंटाळले मी तुमच्या दोघांच्या धुसफुशीला .जा तू. मायाला समजावते मी.
”नैना जेमतेम नर्सरीत होती. घरची ऑईलमिल आणखी दोनचार एजन्सीजचा व्याप माया आणि मावशी बघत होत्या.तसंही माझ्यावर कुणीच अवलंबून नव्हतं. तेच मला पोसत होते आणि तेच मला टोचत होतं तेव्हा. त्या धंद्यात मला रस नव्हता. मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा घालमेल होत होती पण कुठंतरी आत सुटकेचा निश्वासही सोडला मी! बायकांच्या तावडीतून सुटका झाल्याचा आनंद होता.

चालता चालता विचारांच्या तंद्रीत घराजवळ पोचलो. शिवराज हातात फोन घेऊन उभा होता. अरेच्चा, फोन सोबत नव्हता नेला हेही लक्षात नाही माझ्या !

”कुणाचा फोन आला होता?” मी व्हरांड्याच्या पायऱ्या चढता चढता विचारलं.

” दोनदा वाजलाय. बघ तूच!” म्हणत तो आत गेला. मी असा फोन ठेवून गेलो कि शिवू जाम चिडतो. मी नेमका कुठं आहे ते कळत नाही ना त्याला ! वारंवार सांगूनही हल्ली माझा फोन घरीच राहतो.

” विक्रम, तुला सांगून दमलो मी ! मागच्या औट हाऊसची कौलं बदलायची आहेत. पार्किंग शेडचे पत्रे गंजलेत. पाणी चढवायची मोटार अस्लम दुरुस्तीला नेतोय .अंघोळ करून घे. नाहीतर संध्याकाळी कर!” माझ्या हातात कॉफीचा कप देत शिवू म्हणाला.

मी फिल्मच्या वितरणाचे सगळे सोपस्कार झाले की येतो इथं. माझ्याआधी महिनाभर शिवू मुंबईहहून इथं येतो. इथलं सगळं त्यालाच बघावं लागतं. एकटेपणाला कंटाळतो. बायका मुलाना विजापूरला ठेवून तो गेली वीसएक एक वर्षं माझ्यासोबतच वावरतोय. यावेळी मी महिनाभर राहायचं म्हणून आलोय खरा. पण किती राहायला मिळेल कोण जाणे!

फोटोग्राफीच्या छंदापोटी म्हणण्यापेक्षा त्यातच काम मिळवण्यासाठी घराबाहेर पडलो. अपयशी होऊन माघारी जायचं नाही ही खुणगाठ मनाशी पक्की होती. सुरवातीला अधे मधे पुण्याला भेटायला जायचो. निघताना पाच दहा हजार रूपये पमामावशी गुपचुप रुमालात गुंडाळून माझ्या बॅगेत ठेवायची. मलाही ट्रेनमधे बसल्यावर ते शोधायचा चाळाच लागला होता. त्याकाळी पाच हजारात दोनतीन महिने भागायचं माझं. जर कफल्लक होऊन गेलो असतो तर मायानं ऑईलमिलच्या गल्ल्यावरच बसवलं असतं मला, पमामावशीच्या माघारी माया झक्क बिझनेस करतेय .आतातर खूपच वाढवलाय व्याप .नैना मदतीला आहे. उलट नैना तर तिच्यापेक्षा जास्त व्यवहारी. डिट्टो दूसरी पमामावशीच... कि पणजोबा? पठ्ठी अकरावीत असतानाच मला विचारत होती बाबा, तुझा इन्कमटॅक्स वेळेवर भरतोस ना?

आज एवढं कमावलं ते पमामावशीमुळं. दहावीनंतर बँकेत माझं खातं काढून त्यात ती माझ्या खर्चासाठी पैसे टाकू लागली. मीही तिच्याकडं थेट न मागता लागतील तसे बँकेतून काढायचो. जपून पैसे वापरायचो.

कोण होतो मी तिचा! पमामावशीच्या मैत्रिणीचा, सरूचा मुलगा. मी पाच वर्षाचा असताना आई काविळीनं आठवड्याभरातच गेली .बाबा भ्रमिष्टागत फिरू लागले. भाड्यानं द्यायच्या सायकलचं दूकान मोडून खायलाच आलं होतं. ते विकून मला आणि बाबाना राजन काका आणि पमामावशीनं लांज्यावरनं पुण्यात आणलं.

बाबा ऑईलमिलमधे सुपरवायजरचं काम करू लागले. पण दिवसेंदिवस पिणं वाढतंच होतं. मी पाचवीत असताना रक्ताची उलटी होऊन गेले आणि मी ऑईलमिलच्या आऊटहाऊसमधनं पमामावशीच्या घरात राहायला गेलो.
मायापेक्षा जास्त जीव लावला तिनं मला. राजनकाकाला आवडायचं नाही ते. पण पमामावशी त्याचा सगळा बिझनेस सांभाळायची. त्याला मोकाट सोडला होता. जे पमामावशीनं केलं राजनकाकासाठी तेच माया माझ्यासाठी अजून करतेय. काका कॅमेऱ्यात तासनतास रमायचा. कॅमेरा खोलून रिपेअर करणं हातचा मळ होता त्याच्या. मीही शिकलो तेच. सतत सोबत असायचो मी त्याच्या .

राजनकाका सिंधी. फाळणीनंतर ते कुटुंब कराचीतनं घरातलं जमेल तितकं धन, वस्तू गोळा करून भारतात आलं. निर्वासित कँपामधून इथून तिथं, तिथून तिथं करत पुण्यात स्थिरावलं .हळूहळू तिकडचा धंदाच इकडंही सुरू केला. पमामावशी दहावीनंतर लांज्याहून तिच्या मामासोबत कॉलेजसाठी म्हणून पुण्यात आली. सकाळी सात ते दहा कॉलेज करून नंतर पाच वाजेपर्यंत गोकुळदास माखिजांकडे कारकुनी करू लागली. गावभर फिरणाऱ्या उनाड मुलाऐवजी ही मुलगी लागेल ती सगळी मदत धंद्यात करू लागली.

एक दिवस लांज्यात बातमी आली. सावंतांच्या पद्मानं माखिजाच्या पोराशी लग्न केलं. घरच्यानी संबंध तोडला .पण माझ्या आईनं नाही तोडलं, उलट तिला जपलं. कागदपत्रांसाठी लांज्याला आली तरी तिच्या घरी न उतरता माझ्या आईकडंच उतरायची. वर्ष दोन वर्ष लांज्यात गदारोळ झाला. नंतर सगळं शांत झालं. कारण पुढच्या दहा वर्षात गावाकडची पाच पंधरा तरी मुलं पुण्यात तिच्यामुळं पोटाला लागली. मी त्यातलाच एक तिचा जावई. मायाच्यावेळी पमामावशीच्या बाळंतपणासाठी आई मला घेऊन पंधरा दिवस आधीच पुण्याला आली होती.

राजन काकाला जावून वर्ष झालं होतं. बी.कॉम सेकंड क्लासमधे मी पास झालो. आणि मावशीनं समोर बसवून विचारलं ,

“पुढं काय करणार आहेस?“

“नाही ठरवलं तसं खास! तू सांग काय करू?”

“मायाशी लग्न करतोस? हे बघ सक्ती आजिबात नाही.” हे म्हणजे माझ्यासाठी आंधळा मा गतोय एक डोळा देव देतोय दोन असं झालं होतं. राजनकाकासारखी गोरीपान धारदार नाकाची आणि मावशीसारखी उंचीपुरी शेलाट्या बांध्याची माया एखाद्या अप्सरेसारखीच होती. कदाचित मायाची आणि माझी जवळीक तिलाही दिसत असावी.

आमचं लग्न झालं. वर्षाच्या आत नैना झाली .माया लेकीत आणि बिझनेसमधे इतकी गुंतली कि आपल्याला नवराही आहे हेच विसरून जायची. माझा जास्तीत जास्त सुसंवाद फक्त मावशीबरोबरच होता. कुरबुरी सुरू झाल्या.

नैना आईबरोबर शाळेत जायची, आजीबरोबर घरी यायची. मग आजी जायची आई यायची .मायलेकी खेळत बसायच्या. बागेत जायच्या. मी कॅमेरे आणि राजनकाकाची जुनी बजाज चेतक घेऊन दिवसभर इथं तिथं फिरत राहायचो. फोटो काढत फिरायचो .घरातल्या एका खोलीत फोटो डेवलप ही करायचो. आता हे डिजिटल कॅमेरे आलेयत. माझी जुन्या कॅमेऱ्यातली फोटोग्राफीही सुंदर होती. नवी डिजिटल टेक्नॉलॉजी रॉबीनदांकडे शिकलो.

‘सावरियाँ तूझबिन चैन कहाँ से पाऊँ. ’ रिंगटोनवर निर्मला अरूण आणि लक्ष्मी शंकरची माझी आवडती ठुमरी वाजतेय.

” विक्रम, फोन वाजतोय घे की!” अंगणातून शिवराज ओरडतोय . रॉबीन दासगुप्तांचा फोन

”विकी, काँग्रॅटस!”
”क्यूँ दादा?”

”बिकी कहाँ हो तुम? टीवी, पेपर, न्यूज, देखते नहीं क्या ? ”

” नहीं दादा, लोणावळा में हूँ। एक महिना फुल्ल रेस्ट मिन्स रेस्ट। फोन को पकडा भी नहीं। सिर्फ आराम!”

”तभी त्तो. तुम्हारी ‘परिक्रमा ’ को ऑस्कर नॉमिनेशन मिला ये पक्का न्यूज है. ‘बरगद की बातें‘ को नॅशनल अवार्ड मिलनेवाला है बिटुआ! ये गॉसिप है! पक्का पता नहीं “

मी निशब्द. ऑस्करची फक्त स्वप्न बघायचो..

“साला तू भी ना एक तो लो बजेट फिल्म बनाता है ...दुगना तिगना पैसा कमाता है...अपनी मर्जी से फिल्म बनाता है ..प्रोड्युसर ,डायरेक्टर,स्क्रिप्ट रायटर , सिनेमॅटोग्राफर , साउंड रेकॉर्डिस्ट ,कास्टिंग डायरेक्टर सबकुछ तूही ..याने पाँचो उँगलियाँ ही नही पुरा का पूरा तूही घी में?”

रॉबिनदा धोधो बोलत सुटलेत .एक गुरू शिष्याचं कौतुक करतोय. अजून काय हवंय!

” दादा ,सबकुछ आपका ही है ! ”

”ठीक है. मेरा प्रॉफिट परसेंट भेज दो भाई!”

खो खो हसत दादा बोलत होते. मी जेमतेम पुढचे चार दात असणारे रॉबिनदा हसताना कसे दिसत असतील विचार करतोय.

” बिकी, एक बॅड न्यूज है रे! शर्वरी सिन्हा ने कल रात सोईसाईड किया .”

” ओ गॉड .आएम शॉक्ड. क्यूँ दादा ! बहुत अच्छी डिरेक्टर थी वो !”

”फ्रस्ट्रेशन था. उसके हिसाब से अच्छा काम नहीं हो रहा है ! मूँहफट तो थी ही पैलेसे. ऑफर्स कम मिल रहा था. काम कम हो गया. पिछली फ्लॉप फिल्म का कर्जा था. सुबोध से भी झगडा शुरू था. काय करती रे बॉबॉ ती बेचारी. सब तुम्हारे जैसे धूर्त, डाकू थोडे ही है?” मधेच एक मराठी वाक्य सोडत दादा खिन्नपणे हसतायत.

”दादा, अब मुझे भी थकान महसूस होती है. इसी लिए आराम कर रहाँ हूँ !” मी स्वतःशीच पुटपुटल्यासारखं म्हणालो. पण म्हाताऱ्याला बरोबर ऐकू गेलं.

” बिक्रम, कोई परेशानी होगी तो मुझे बताओ! तू सयाना है .... बीवी बच्चीवाला है. तुझे पता है जिंदगी क्या है। देख बेटा,अब इस बुढ्ढे को ज्यादा दर्द मत देना। ”

दादांचा आवाज कातर झाला . गंभीरपणे काही सांगायचं झालं तर सुरवात बिकी ऐवजी बिक्रमने करायचे दादा.
डाकू ,धूर्त ,बदमाश हे दादांचे कौतुकाचे शब्द. शर्वरी आणि मी दोघेही दादांचे एकेकाळचे असिस्टंट. शर्वरी मला बरीच सिनियर. दादांशीही खूप वाद घालायची ती. ‘पोगली बच्ची है!’ म्हणत दादा दुर्लक्ष करायचे.

‘बरगद की बातें’ चं स्क्रिप्ट घेऊन सुरवातीच्या उमेदीच्या काळात दादांकडं जाण्याआधी शर्वरीकडं मी गेलो होतो. वर वर चाळून म्हणाली, “दम नहीं है रे इसमें. कुछ मत बना इसका. विक्रम, तू सासू माँ का बिझनेस क्यूँ नहीं देखता वापस जा कर?” आउटडोअर स्पॉटवर, ज्या दगडावर पाय ठेवून बसली होती. तोच दगड उचलून डोक्यात घालावा वाटला होता तेव्हा. पण खरंच होतं तिचं. जसा शिकत गेलो तसं त्या स्क्रिप्टमधे बरेच बदल केले. टायटल सोडलं तर मूळ संहिता कुठंच राहिली नाही. पिक्चरच्या स्क्रिनिंग नंतर पहिलं कौतुक करणारी शर्वरीच होती. दादांचा असिस्टंट झालो .तिथंही फार मनस्ताप दिला हिनं. पण तिच्या क्रिएटिविटीचा जबाब नहीं. मनासारख्या एका शॉटसाठी दोन दोन दिवस घालवायची ती. एकच फिल्म ‘चेकमेट’ नं अढळपद मिळवून बसली.

चेकमेटच्या एडिटिंगच्या वेळी काहीतरी अजून हवं होतं तिला. मला बोलावलं. मलाही काही सूचत नव्हतं. क्लायमॅक्सवर एका ठिकाणी दोन मिनिटाचा रील मिळमिळीत वाटत होता. काहीतरी सूचवावं म्हणून मी माझ्याजवळचा डौलदारपणे येणारा नाग आणि नंतरची मुंगुसाची फाईट याचं ऍनिमेशन आणि पाठीमागे कुसुमाग्रजांची मराठी कविता अहि नकुलचं सादरीकरण तिला दाखवलं. दोन मिनिटाच्या जागी सात मिनिटाची ही भर तिला कितपत आवडेल मलाच अंदाज नव्हता. ते सगळं घेतलं आणि माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाली ,

“देअर यू आर ! लव यू विक्रम, तुला आठवतं मी तुला वापस जा म्हणाले होते. थँक गॉड, गेला नाहीस ! गॉड ब्लेस यू डिअर! रॉबीनदानी हिरा शोधला आहे.” मुंबईत वाढल्यामुळे शर्वरी मराठी छान बोलायची.

दादांकडं काय नाही शिकलो! शिव्या खूप देत पण हातचं काहीही न राखता सगळं शिकवत गेले. ए-टू झेड सगळं तिथंच शिकलो. सगळंच आवडीचं होतं.गेली बारा वर्षं त्यांच्याच सल्ल्याने ‘माया क्रिएशन‘चं स्वतंत्र युनिट बनवलं. फिल्मस, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंट्री, कॅटलॉग, कॅलेंडर, अॅड काय नाही बनवलं! कितीतरी नव्या जुन्या मॉडेल्सना पोर्टफोलिओ बनवून दिले. बांद्र्याला भाड्याच्या घरात राहणारा मी, ही लोणावळ्याची कॉटेज आणि चेंबूरला युनिअन पार्कमधे दोन बेडरूमचा आलिशान पण छोटा बंगला घेऊ शकलो.

सगळा वन मॅन शो. आता सर्व कर्जमुक्त ,पुढच्या फिल्मचं भांडवलही हातात. फ्रॉफिट लॉस सगळ्याला जबाबदार मी.
पण आता काही करू नये वाटतंय. जे गमावलंय त्याचाच जास्त विचार डोक्यात येतो. मायानंतर अनेकजणी आयुष्यात अळवावरच्या थेंबासारख्या आल्या नि गेल्या. कुठंही रमलो नाही मी. आजही डोळे मिटल्यानंतर डोळ्यापुढं येतात ते मायासोबतचेच क्षण. खूप काही मिळाल्यावर एक रिक्तता येते. विषाद येतो. यातून लवकर बाहेर पडायला हवं एवढं मात्र नक्की.

असो, गेल्यावर सुबोधला फोन तरी करायला हवा. कशीही असली तरी बायको होती त्याची शर्वरी! तिचा मुलगा अमेरिकेत असतो. तोही भेटला तर पाहू. अधे मधे आणायची त्याला सेटवर. सुरुवातीला एवार्ड फंक्शनलाही मुलाला घेऊन यायची. नंतर तिनं येणं बंद केलं. मीही बंद केलं समारंभाना जाणं. सगळा भंपकपणा असतो.

२.
का बरं केली असेल शर्वरीनं आत्महत्या? सुबोध एवढा मोठा उद्योगपती, त्यानं का तिला आवरलं नाही? फक्त आर्थिक कारण कि आणखी काही !” या इंडस्ट्रीला आत्महत्या नव्या नाहीत. कर्ज, फ्लॉप फिल्मचं फ्रस्ट्रेशन, असफल प्रेमप्रकरणं, ब्लॅकमेलिंग, जीवघेणी स्पर्धा, नातेसंबंधातला कोरडेपणा अशी अनेक कारणं आहेत.

माझ्या मनातले विचार थांबतच नाहीत. महिनाभर काय राहणार इथं मी? मन अशांत आहे .जावं का परत मुंबईला? मायाशी बोलू का? तिला जावून भेटू का? नाहीतरी मलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.अत्यंत मानी आहे ती .का असू नये तिनं? हॉर्टिकल्चर डिग्री होल्डर ती. ते क्षेत्र सोडून तिला घरचा धंदा सांभाळावा लागला केवळ माझा छंद पुढे नेण्यासाठी. तिला एक एकर शेत घेऊन देऊन कर बाई तुला जे करायचंय ते असं का सांगितलं नाही मीही पुर्वीच! फोनवर रूक्ष बोलणं व्हायचं. फिल्मला अवार्ड मिळाला कि माया अभिनंदनाचा फोन आवर्जून करायची. नैना बीकॉम नंतर एमबीए की सीए काहीतरी करणार आहे ही कधीची बातमी बरं?

मीच सांगू का फोन करून तिला परिक्रमा ऑस्करला पाठवतायत म्हणून? मायाला फोन करताना ताण का येतोय बरं! खरंतर काहीच कारण नाही. जन्मल्या जन्मल्या जिला पाहिलं अशी बालमैत्रीण, बायको, माझ्या मुलीची आई आहे ती. जिच्याशी मनसोक्त भांडलो, बेभानपणे प्रेम केलं ,तनामनाने एक झालो ती आज इतकी दूर असल्यासारखं का बरं वाटतंय!

“विक्रम, मी विजापुरला जातोय. पल्लवीचं लग्न करतीय विजया. एक दोन तीन महिने तिथंच रहाणार आहे!” शिवू हातात पाण्याची झारी घेऊन हॉलमधे शिरताना म्हणाला. पल्लवी, शिवूची सर्वात लहान मुलगी लग्नाला आली?
“सगळे राग राग करतात रे माझा कुठलीच जबाबदारी मी घेत नाही म्हणून. पैसे देऊन कामं होत नाहीत. तुम्ही या आणि इथं थांबा म्हणून म्हणत होती फोनवर!” शिवू पुरवणी जोडत म्हणाला .

“जा तू. पैशाची काळजी करू नको. थांब जेवढे दिवस हवंय तेवढे दिवस ! नवरा मुलगा काय करतोय?”

“थोरल्या सूनबाईच्या नात्यातला आहे. जमखंडीजवळ खेड्यात चार पाच एकर शेतीवाडी आहे. हे दोन भाऊ. थोरला शेती बघतोय. म्हशी, बैलं आहेत. दूधाचा जोडधंदा आहे. दोन मोठ्या बहिणींची लग्नं झालीत. नवरा मुलगा आलमट्टी धरणावर इंजिनिअर आहे. डिप्लोमा झालाय. पल्लवीला पण तिथल्या कोऑपरेटिव बँकेत नोकरी मिळेल म्हणतात तिच्या सासरचे. आहे कुणीतरी नात्यातला तिथं.”
झारी आत ठेवून जवळच्या खुर्चीवर बुड टेकत शिवू म्हणाला .

“विक्रम, हल्ली घरी गेलं तरी उपऱ्यासारखं वाटतं बघ. विजया पोरा बाळांचं करून थकलीय .चिडचिड करते. आता बास करा तुमचे व्याप म्हणते. पोरंही परक्यासारखं वागतात रे. लांब लांबच असतात. थोरली दोघं जरा तरी बोलतात. पल्लू एकदम लांब असते. मी इकडं अडकलो. तिकडं ती बघता बघता मोठी झाली. निघाली आता तिच्या घरी!” शिवूचा गळा भरला होता.

“विजयाला इकडं घेऊन आलो तरी ती रमणार नाही. तिचा जीव तिथंच अडकलाय सुना नातवंडात. आता सोबत मी पण हवाय तिला!” बोलताना शिवराजला दम लागला.

“उद्या निघ तू! जाताना माझा हँडीकॅम घेऊन जा. छान शुटिंग कर. आपण अल्बम बनवू.” मी त्याला समजावतोय खरा. शिवू माझ्यापेक्षा दोन तीन वर्षं मोठा असेल पण लग्न, पोरं फार लवकर झाली. रॉबिनदांचा स्पॉटबॉय होता तो. सलग आठवडाभर मला त्यांच्याकडं नेत होता. माझे फोटोग्राफ्स, व्हिडिओ शुटिंग एकदा तरी बघा म्हणून त्याना गळ घातली. त्यानंच मला काम द्यायचा दादांकडे आग्रह केला. सगळं शिकायला लावलं. दादांकडून माझ्यासोबतच बाहेर पडला.
तपं उलटली.

काळाला कोण थोपवणार मलाच त्रेपन्न वर्षं होतील. माया पंधरा ऑगस्टची आणि मी डिसेंबरचा. पुढच्या आठवड्यात तिलाही एक्कावन्न पूर्ण होतील. थकली असेल तीही. माझं वेड जोपासण्यासाठी तिला सोडून निघालो मी. अनेक खस्ता खाल्या पण परत गेलो नाही. सगळा प्रपंच तिनं एकटीनं ओढला. एका दमड्याचीही अपेक्षा केली नाही .मी तरी कुठं विचारलं? आपल्याच कैफात होतो. आता सगळं सोडून तिच्याकडं जावं वाटतंय. नैनाला काय वाटत असेल माझ्याबद्दल ? जगाचे फोटो काढले. माझ्या लेकीचे वयात येतानाचे फोटो कुठायत माझ्याकडे? या ‘मी’ नं संपवलं मला. कमावलेल्यापेक्षा गमावलेलं जास्त टोचतंय मला आता. डायरी कुठं बरं ठेवलीय मी? काहीतरी लिहिल्याशिवाय चैन पडणार नाही मला.

बंद मुठीत अडके मिणमिणता प्रकाश
सैलावल्या गात्रामधे उगा रुततात पाश।।
किती दारे या वाड्याना बंद दारे उघडली।
पाय बाहेर टाकता आत रेंगाळे सावली।।
संधीप्रकाशाचा खेळ कसा संपता संपेना।
आणि पंख अंधाराचे उघडुनिया मिटेना ।।
कधी घुमतो पारवा कधी वाजते पावरी।
धास्तावला मनपक्षी कोण तयास सावरी।।

दोन दिवस झाले शिवूला जावून. ‘लग्नाला ये!’ असं सांगून गेला. कसं काय जमतंय बघू. काल आऊट हाऊसची कौलं बदलून झाली .पार्किंगचा पत्रा बदलला. जूनी मोटार पार कामातून गेली होती, नवीच आणली.अंग मोडून बागेत राबलो. खूप वेगवेगळी काम मन लावून केलीत मी या दोन दिवसात.

उद्या सतीश पालवे त्याची टीम घेऊन ‘गप्पागोष्टी’ सदरासाठी इंटरव्यू घेणार आहे इथंच. मी कधीच मुलाखती ,गप्पागोष्टी या फंदात पडत नाही. पण यावेळेला त्यानं आग्रहच धरला आहे. हीच मंडळी माझ्या सिनेमाचं परस्पर प्रमोशन करतात. माझी लफडी,व्यक्तिगत आयुष्य कमी आणि माझी कला, त्यातील बारकावे, सौंदर्य जास्तीतजास्त लोकांसमोर नेतात. का कोण जाणे पण यावेळेला खूप बोलावं वाटतंय, सांगावं वाटतंय, मनातली खंत मांडावी वाटते .चुकांची माफी जगासमोर मागावी वाटते. पडद्याआड जे व्यक्तिगत आयुष्य आहे ते येऊ दे लोकांसमोर. छंदाचं पॅशन कसं होतं, कलात्मकता जशी वाढते तसं यश येतं पण याची जबर किंमत कशी मोजावी लागते हे कळू दे जगाला .

3. नैना

अँब्युलन्सचा किती कर्कश हॉर्न आहे. मध्यरात्रीचा ससूनकडे कुणीतरी अंतिम प्रवासाचा जीव निघाला असावा बिचारा. नववीत असताना पमाज्जीला असंच रात्री नेलं होतं.झोपेत ठसका लागला.मम्मा उठून तिची पाठ थोपटतेय तोवर कोसळली. मम्मानं मला उठवलं. अँब्युलन्सला फोन केला. पंधराव्या मिनिटाला ससूनमधे पोचलो. अर्ध्या तासात गेली हे कळालं. घरीच गेली होती ती. पहिला फोन बाबाला केला. पहाटे पोचलासुद्धा तो. दवाखाना ,अँब्युलन्स हे कधी मी ऐकलं पाहिलंच नव्हतं.एका रात्रीत मोठी झाल्यासारखं वाटलं.

एखाद्या राजकन्येसारखं दोघीनी मला वाढवलं. बाबा आपल्याजवळ नाही याचं तेव्हा काहीच वाटायचं नाही. छान छान फ्रॉक्स ,फॅशनेबल शूज ,हेअरबँडस, लेडीबर्ड सायकलं एवढंच काय पहिला मोबाईल हे सगळं मम्मानं बाबानं पाठवलं असं सांगत स्वतःच आणलं. मलाही कळत होतं सगळं. पण खोटंखोटं,एकमेकाना फसवत जगण्यातही मजा असते हे तेव्हापासून कळतंय मला. पमाज्जी गेल्यावर मम्मा सून्न झाली होती काहीकाळ पण तिच्यातली आई मात्र कायम जागी. आजीचे दिवस झाल्यावर शांतपणे तिनं बाबाला व्यापातून मोकळं केलं. अलिकडं मात्र थकल्यासारखी वाटते. सोशल लाइफ असं नाहीच तिला .बागेतच जास्त वेळ रमते. केवढी नर्सरी वाढवलीय. आउट हाऊस तोडून तिथंही नवी कलमं लावलीत. रोज काही ना काही भर पडतेच त्यात.
मागच्यावर्षी तिची पन्नाशी दूर्वांकूर सेलेब्रेट केली तेव्हा मोतिया रंगाच्या प्युअर सिल्क साडीत कसली गोड दिसत होती! ते सगळे फोटो नीट प्रिंट काढून अल्बममधे लावले पाहिजेत. बाबा, आजोबासारखीच फोटोग्राफीची आवड माझ्यातही आलीय आणि आजीकडून बिझिनेस सेन्स आला. याचं केवढं कौतुक करत असते मम्मा.

मोबाईल वाजला. इतक्या रात्री कुणाचा मेसेज? अमोलचा. लिंक पाठवलीय यूट्युबची. बाबाचा इंटरव्यू आहे? छे असल्या फंदात कधीच नसतो तो. बापरे अर्ध्या तासाची क्लिप आहे. अमोल म्हणतोय सगळी नीट बघ. झोप येतेय. तरी बघू म्हणतोस? ओके बॉस.

अरे वा ,बाबाची परिक्रमा ऑस्करला नॉमिनेट झाली? क्या बात है! ...

मशीदीचा भोंगा वाजतोय पाच वाजले. थोडी बघू म्हणत रात्री लिंक पूर्ण बघितली. कितीवेळ रडत होते मी. बाबानं इमोशनल करून सोडलं मला. जेन्युइनली बोलत होता तो. आजिबात फेकत नव्हता. निम्म्याहून अधिक वेळ तो आमच्या दोघींबद्दल आणि पमाज्जीबद्दल बोलत होता. मी आणि मम्मानी त्याच्या करिअरपोटी किती सोसलंय हे सांगत होता. खरंच इतकं सोसलंय का आम्ही? मी तर नाहीच. जे कधीच फारसं बाहेरच्या कुणापुढं आलं नाही. ते जगासमोर त्यानंच आणलं. मम्माच्या आठवणी सांगताना त्याचाही गळा भरून आला होता.

आम्ही इकडं छान चमचमीत जेवत असताना तो तिकडं अर्धपोटी दिवस काढत होता. पैसे पुरवून वापरत होता. चाळीत राहिला . अपमान सोसले. यातलं काहीच आम्हाला माहित नाही. बाबा यू आर ग्रेट! मी कधी तुला एवढं मिस केलं नाही. माझ्या जगात तू जवळ नसण्याचं दुःख कधी नव्हतं. मम्मा आणि माझं स्वतंत्र जग मला पुरेसं होतं. सगळी मित्रमंडळी तुझ्या पिक्चरचं कौतुक करायची .तुझं कौतुक करायची. माझा हेवा करायची .मी मात्र माझ्याच मस्तीत. शाळेच्या ट्रीप्स ,कॉलेजच्या ट्रीप्स सगळीकडे मम्मानं मला पाठवलं. मित्रमंडळीत मजा करू दिली. खरंतर माझ्या जगात तू कुठंच नव्हतास. तुझ्या फिल्म्सही मी कधी पाहिल्या नाहीत. नावं फक्त ऐकून होते. मम्मा सगळ्या फिल्म्स बघायची. ती आणि अमोल चर्चाही करायचे त्यावर. मी माझं ऑडिट, बॅलन्सशीट यातच अडकलेली. खरं सांगायचं तर तुझ्यापेक्षा नवनवीन प्रयोगाना थेट भिडणारी मम्माच मला अजूनही ग्रेट वाटते .

पण ही मुलाखत ऐकल्यावर आता वाटतं मम्मानं तुला नक्कीच मिस केलं असणार .कारण तू जेव्हा जेव्हा यायचास तेव्हा मी आजूबाजूला आहे हे माहीत असून तू मम्माला कडकडून मिठी मारायचास. तीही सगळं विसरून तुला एखाद्या वेलीसारखी बिलगायची. तसा मलाही जवळ घ्यायचास तू. पण मला मात्र तू लवकर निघून जावंस असं वाटायचं. माझ्या आणि मम्माच्या मधे आल्यासारखा वाटायचास. ते अल्लड वय होतं, पण आज कळतंय तिला तुझी किती आठवण येत असावी! बाबा तू ये. दोघं एकमेकाजवळ रहा .माझी काळजी करू नका.

डोळ्यात अजून झोप आहे. नाहीतरी टॅक्स भरणं वगैरे सगळं आटोपलंय .जरा निवांतच उठावं.

“काय नैनुल्या, आज उठायचंय की नाही? नऊ वाजले बेटा. चल ऊठ. अमोल आलाय. चहा घेऊया चल” मम्माचा हात केसातून फिरतोय माझ्या. नेहमीसारखी मला अजूनच गुंगी येतेय. मी डोकं उचलून तिच्या मांडीवर ठेवलं. मला चापटी मारून उठवत म्हणाली ,” सवयी सगळ्या आपल्या बाबाच्या उचलल्यास हं तू अगदी!”

तिच्या गळ्यात हात टाकत मी म्हणाले, “बाबाची परिक्रमा ऑस्करला नॉमिनेट झाली.”

“ ग्रेट, खरंच भारी न्यूज आहे ही. तुला कुणी सांगितलं?”

“ अमोलनं बाबाच्या इंटरव्यूची यू ट्यूब लिंक पाठवलीय. अर्ध्या तासाचा इंटरव्यू आहे. मम्मा बघ तू सगळा. माझ्यासारखंच तुलाही रडायला येईल ग.”

मी मोबाईल तिच्या हातात देतेय. पण ती स्वतःच्याच तंद्रीत उठली. कदाचित त्यालाच फोन करायचा असेल तिला.
आता कदाचित बाबाला इकडंच बोलवेल थोडे दिवस. माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तिला अमोलकडं जायचंय. सोबत बाबा हवा असेल तिला.

मला लग्न वगैरे गोष्टीत इतक्यात अडकायचं नाही. पण गेले साताठ वर्षं मी आणि अमोल एकत्र फिरतोय. बिझिनेस वाढवण्याचे दोघांचे प्लॅन्स आहेत. शिरवळला त्यानं प्लॉटही घेतलाय इंडस्ट्रीसाठी. शेतजमीनही मिळाली तर घेणार आहे फळबागेसाठी. मम्मा आणि त्याचे बरेच प्लॅन्स आहेत. फक्त ऑईलमिल इथं ठेवून बाकी मसाले लोणची तिखट कडधान्य,डाळी, वगैरे प्रोसेसिंग युनिट तिकडं सुरू करूया म्हणतो तो. माझं काहीच अजून ठरत नाहीय. पण आता मम्मा ऐकणार नाही. या बाबतीत एकदम पारंपारिक आई आहे ती. काय होतं बघू.

४.माया
आज विक्रम येणार आहे. खरंतर खूप उत्साहानं त्याच्या आवडीची फिश करी मी बनवणार होते. पण अमोल आणि नैना दोघंही म्हणतायत आपण बाबाकडून पार्टी घेऊया. अमोलला दुखवायला आवडत नाही. जावई आहे तो लाडका. जावई लाडकाच असतो नेहमी म्हणा. विक्रम काय कमी लाडका होता माँचा. मी चिडवलं की विक्रम खिदळत ‘फू बाई फू’ गाणं जोरजोरात म्हणायचा. खासकरून त्यातलं कडवं

माय लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीती मोठी
लुगडं सोडून देऊ लागली जावयाच्या साठी

दोघंही जोरात खिदळायचे. माँ गेल्यानंतर जबाबदारीनं अधून मधून फोन करायला लागला विक्रम , पण त्याचं येणं कमी झालं. असं वाटायचं माँ हा एकमेव पाश होता त्याला आमच्याशी जोडून ठेवणारा. खूप मोठा झाला विक्रम. त्याच्या बद्दलचे गॉसिप्स कुणी ना कुणी सांगायचं. पण त्याला याबद्दल एका शब्दानंही विचारलं नाही मी.

माँ नेहमी सांगायची, ”त्याचं क्षेत्र निसरडं आहे. घसरू शकतो माणूस एखाद्यावेळी. मूळात तो एक वादळ आहे. मी लिहून देते माया. तो कुठंही रमणार नाही. तुझ्याकडेच येणार सगळी हौस फिटली की. तो मनानं फक्त तुझ्यात अडकलाय. त्याला कधीही जास्त प्रश्न विचारू नको. बांधून ठेवायचा प्रयत्न करू नको. जितका मोकळा सोडशील तितका तुझाच राहील.”

कधीकधी मला त्याची खूप आठवण यायची. पण नैनानं मला पूर्णवेळ कामात ठेवलं. तिची शाळा, स्पर्धा, चित्रकलेच्या परीक्षा, डान्सक्लास, नाटकं सगळ्याचा मीही एक भाग होते. आता नैनाचं लग्न झालं की मी विक्रमसोबत जायला मोकळी. पण त्यानं बोलावलं तरच. भले तो बोलावेलही पण मी माझी बाग, घरदार,माझं जग सोडून जाणार तरी कशी? काहीतरी सुवर्णमध्य काढूच.ही पोरं आहे तो धंदा नक्की वाढवतील.

विक्रम यायच्या आधी नैना आणि अमोल दोघेही आले तर बरं होईल. आता विक्रमचं भरभरून प्रेम, आवेग,झपाटा झेपणार नाही मला. हसायला येतंय मला. पण तो तसाच आहे. मला शाळेत न्यायचा सोबत. बाजुनं वेगात गाडी गेली तर त्याच्या दोन हातांच्या गोल कड्यात मला जपून ठेवायचा. मी दूसऱ्या मिनिटाला त्यातून बाहेर निसटायची.

खरंतर रक्षाबंधन, भाऊबीजेला पप्पा मुद्दाम काहीतरी सूचवायचे. पण माँनं जाणीवपूर्वक भाऊ वगैरे नात्यात त्याला अडकवला नाही. माझं सिंधी कम्युनिटीत लग्न होऊ न देण्यात माँचं धोरणच महत्वाचं. मुद्दाम आमच्यात जवळीक होईल हे तिनं पाहिलं. शेवटपर्यंत पप्पा सिंधी मुलं हेरत होता. आणि माँ मला विक्रमसोबत सिनेमा, नाटकाना, बाहेर फिरायला बिनधास्त पाठवत होती. पप्पा त्याचा राग राग करायचा. पण सोबतही ठेवायचा.

शेवटी पप्पाचं हागणं मुतणंही विक्रमनंच काढलं.सहा महिने अर्धांगवायूनं बेडवर पडला. हळूहळू एक एक अवयव गेला. आणि एक दिवस पप्पाही. जसं पप्पाचं आजारपण सुरू झालं तसं धोरणीपणे माँनं मृत्युपत्र बनवलं .त्याच्या सह्या घेतल्या. विक्रम मुंबईला गेल्यावर स्वतःचंही विल बनवून प्रॉपर्टीवर माझं नाव टाकलं. स्वतः मोकळी झाली. आता माझी पाळी आहे. नर्सरी तेवढी माझ्या नावावर राहू दे. एक एक करत जंगल झालंय त्या एवढ्याशा जागेचं.

“अरे राजू, त्या कुंडीतलं आलं आणि गवती चहा तोडून आण बरं! फार नको तोडू. डोळा नीट बघून आलं काप.” विक्रमला बाहेरचा विकतचा मसाला चहात नाही आवडतं. इतक्या दिवसात किती आणि काय आवडी बदलल्यात कुणास ठाऊक!

नैनानं त्याच्या इंटरव्यूची यूट्यूब लिंक बघायला सांगितलीय. निवांत विक्रमसोबतच पाहीन. गाडीचा आवाज येतोय . हे काय? तिघंही एकदमच आले?

चौघंही एकमेकांसमोर उभे आहोत. कुणीच काही बोलत नाहीय. विक्रम थकल्यासारखा दिसतोय. चेहरा रापल्यासारखा झालाय. केसही विरळ होत आलेत. महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचा आक्रमकपणाही कमी झालाय.

टेबलावर चहा घेता घेता सगळे हळू हळू बोलायला लागले आहेत. विक्रम राहून राहून नैनाजवळ उभ्या अमोलकडे रोखून बघतोय .अगदी पप्पा विक्रमकडे बघायचा तसंच.

“नैना, तुझ्या मित्राची ओळख तरी करून दे” विक्रमनंच संभाषणाला सुरुवात केली.

“फक्त मित्र?अरे तो मित्रापेक्षा जास्त आहे नैनाचा. बिझनेस पार्टनर आहे आणि लवकरच... ” मला मधेच थांबवत अमोल म्हणाला

“आंटी प्लीज मी बोलू?” मी मानेनंच हो म्हटलं.

“अंकल, मी आणि नैना शाळेपासूनचे मित्र. बीकॉमपर्यंत एकत्र होतो. ती सी.ए कडं गेली. मी एमबीएला ऍडमिशन घेतली. मधल्या काळात वाईट संगत लागली. रेव्ह पार्टीत पकडला गेलो. वडील पोलिस खात्यात आहेत. तेव्हा माझ्या जवळ ड्रग मिळालं नाही. ताकीद देऊन सोडलं. त्यानंतर शिक्षण थांबलं. घरातच सगळ्यांशी भांडत राहिलो. दारू पीत राहिलो. सगळ्यांसाठी बिनकामाचा झालो. सगळे कंटाळले. एक दिवस मायाआंटी आल्या घरी. आईबाबाना सांगून इथं आणलं. त्यांच्यासोबत बागेत काम करायला लागलो. नर्सरीतली वेगवेगळ्या आंब्यांची कलमं आंटीसोबत मीही तयार केली आहेत. मी काहीतरी छान करू शकतो असं वाटायला लागलं. आंटीबरोबर फिल्म्स बघायचो. आम्ही दोघं पेंटिंग्ज करायचो. गप्पा मारायचो. कमी होत होत पिणं पूर्ण थांबलं. हळू हळू नैनाबरोबर इथला बिझिनेस बघायला लागलो. मागच्या वर्षी एमबीए पूर्ण केलं. आता सगळ्याना वाटतंय आम्ही लग्न करावं. तुम्हाला सगळं माहिती असावं असं वाटलं म्हणून ... ”

तो बोलता बोलता मधेच थांबला.. थोडावेळ शांतता होती.

“नैनाला तू आवडतोस आणि तुला नैना आवडते ना! मग बास की. मियाँ बिवी राजी आहेत ना! तू तुझ्या आई वडिलाना घेऊन येतोस कि आम्ही येऊ तुझ्या घरी प्रस्ताव घेऊन?”

विक्रमनं एका झटक्यात सगळा ताण मोकळा केला.
हा असाच आहे. महिन्याभरात लग्न उरकून टाकतो की काय आता?

नैना अमोल जेवून शिरवळला गेले. घरीच साधा स्वैपाक केला मी. जेवण आवरून येईपर्यंत विक्रम सोफ्यावर लहान मुलासारखा शांत झोपलाय. असं वाटतंय त्याला जवळ घेऊन थोपटावं.

५.विक्रम

मायाचा हात माझ्या केसातून अलगद फिरतोय. उठूच नये वाटतं. गेले पंधरा दिवस नैनाचं लग्न उरकण्यात कसे गेले कळालंच नाही. जरा पोरीशी जवळीक होतेय तोपर्यंत पोर गेली सासरी. कधी नव्हे ते इतकी बिलगून रडली यावेळी. रजिस्टर मॅरेजचा तिचा हट्ट. अमोलच्या वडिलानी फार खळखळ केली नाही. आधीच मुलाच्या मनस्तापातून पोळून निघाले असावेत. खूप भरभरून मायाचं कौतुक करत होते नवरा बायको दोघंही. अशीच आहे माया अगदी स्वयंसिद्धा! अरे वा, तिच्यावरही एकादा सिनेमा निघू शकतो.

पुढं काय करायचं? महिन्याभरानंतर दोघंही इथंच राहायला येतील. तोपर्यंत राहीन इथंच. माया काय करणार? मीही परत जावं का? मनातलं थेट बोलू का?

“माया, पुढं काय करायचं? तू थोडे दिवस लोणावळ्याला येशील? तिथून मुंबईला जाऊ. थोडं फिरूया निवांत. येशील सोबत माझ्या ?”

बराचवेळ माया मला थोपटत राहिली .मला आत भरून येत होते. काळजात दबलेली जुनी जखम खपलीचे पापुद्रे काढत वर आली.

आम्ही दोघं लहान होतो. घरात पकडापकडी खेळत होतो. माझ्या पायापुढं राजन काकाच्या कॅमेऱ्याचं झाकण आलं आणि ते खाडकन उडालं. किंचित तडा गेला त्याला. काकानं खाडकन माझ्या कानाखाली वाजवली. चौथीत होतो तेव्हा. मी होलपाटलो.डोळ्यापुढं अंधारी आली. गाल धरून मटकन खाली बसलो. डोळ्यात पाणी भरलं. माया इतकी संतापली.

“हात लावायचा नाही त्याला तू. तू मारलंच कसं पप्पा त्याला?” म्हणत काकाच्या अंगावर धावून गेली. ते झाकण अजून लांब फेकलं. रडून गोंधळ घातला. मी अजूनच घाबरलो. थरथरायला लागलो. तेव्हा मला जवळ घेऊन कितीतरी वेळ माझे डोळे पुसत थोपटत राहिली.

अशीच होती माया तेव्हाही. त्या आठवणीनं अजूनच डोळे अजून वाहायला लागले. सरणावर जाईपर्यंत आपल्यात कुठंतरी लहानपणात रमलेलं एक लहान मूल दडलेलं असावं.

आज आम्हाला संपूर्ण एकांत असूनही बोलायला शब्द सापडेनात.बघता बघता किती दूर गेलोय आम्ही. माझे डोळे पुसता पुसता ती म्हणाली.

“ विक्रम ,तू घर सोडून गेलास. बिझिनेस आणि नैनात मी स्वतःला गुंतवून घेतलं. माँ होती तोवर दिवसाचा काही वेळ बागेत काम करायची. फ्रेश वाटायचं. माँ गेली आणि मी बिझिनेसमधे अडकले.बागेत जायला वेळच मिळायचा नाही. नैना ग्रॅज्युएट झाली. सीए करतानाच ती पूर्णपणे बिझिनेस बघू लागली. मी दोनतीन तास तिथं जायची. बागेत नवीननवीन रोपं कलमं तयार करू लागले. अमोल आणि नैनानं सगळा बिझनेस हातात घेतला. मी नर्सरी वाढवली. तू बघतोयस ना किती वाढलीय नर्सरी. हेच माझं जग आहे रे आता.”

माझ्या लक्षात आली तिची अडचण. आता यांच्या जगात मला कुठंच जागा असणार नाही हे कटू सत्य पचवावंच लागेल मला. माझ्यापेक्षा शिवराज नशीबवान आहे. त्याची बायको त्याला सोडत नाहीय.

‘चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना’

मी नाटकीपणे गाणं म्हणत उठत असतानाच मायानं माझा हात हातात घेतला.

“विक्रम, मी तुला खूप मिस केलंय. तूही मिस करतोयस मला ते दिसतंय. जमेल तसा एकमेकाना वेळ देऊ .नैना परत आली की आपण तू म्हणतोस तसं फिरून येऊ. मग तू तुझ्या जगात परत जा. मी माझ्या विश्वात येते. तू मोकळा झालास कि इथं ये. अधे मधे मला मुंबई लोणावळ्याला घेऊन जा. ठीक आहे. ”

मी समंजसपणे मान डोलवत उठलो. दोन्ही हातानं तोंड झाकून घेतलं .दीर्घ श्वास घेतला.

“विक्रम, तू आधी थकलास तर मी तुझ्याकडं येईन आणि मी आधी थकले तरी मीच तुझ्याकडं येईन. नैनाला मी सांगितलंय. शेवटी आपण दोघानी एकत्रच राहायचंय एवढं लक्षात ठेव. जो आधी थकेल त्याचं सगळं दूसऱ्यानी करायचंय बरं का! आपण एकमेकांचं एवढं देणं लागतोच ना रे! ...आणि काही झालं तरी माझ्या सासूसारखी मीच आधी ....”

तिला गहिवरून आलं.

“स्वार्थी मुली! एक अक्षर बोलू नकोस... ”

म्हणत मी तिला जवळ घेतलं. परमेश्वरा, स्पर्शातून आश्वस्त कसं करायचं कितीतरी कलाकाराना शिकवलं मी. मलाही ते सहज साध्य होऊ दे. मायापासून सुरू झालेली माझी परिक्रमा मायाजवळ येऊन पूरी होऊ दे. एवढंच तुझ्याकडं मागणं. पुरं कर रे बाबा!

स्वाती ठकार
(ही कथा 2018 च्या पाक्षिक चिंतन आदेशच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे)