Saturday, January 19, 2013

महात्मा गांधी नावाचा महामिष्किल म्हातारा ☺☺☺

       मला गांधीना बघायचा योग आला नाही .पण बालपणीचा काळ गांधी द्वेष आणि ऐकीव बातमीवर गांधी विरोधात  पांडित्य पोसण्यात गेला.घरी वडील पक्के गांधीवादी आणि आई पक्की हिंदुत्ववादी (गांधी द्वेष्टी ) .मी हुबळीला शिकत असताना गांधींविरोधात  शेखी मारत होते .आमच्या शिक्षकानी मला गांधी कसे होते हे गांधी सहवासातील व्यक्तिंकडून जाणून घे असे सांगितले आणि रेड्डी म्हणून एक वयस्क गृहस्थ होते.त्यांच्याकडे शनिवारी जायची ड्युटी लागली .
       राव काका म्हणून माणसाचा बंगला होता .तिथे राव ,रेड्डी आणि भट असे तीन म्हातारे गांधीजीनी लोकाना पाठवलेली आणि लोकानी गांधीजीना पाठवलेली पत्रं होती त्यांचं संकलन करून पुस्तक काढण्याच्या कामाला सुरवात केली होती .तेच हल्लीचे 100च्या वर गांधी खंड आहेत .मी बापडी गांधी समजून घ्यायला गेले होते .त्या तीनही म्हाताऱ्यानी गांधी कसे आहेत हे न सांगता पोत्यातली पत्रं माझ्यापुढं ओतली आणि  भाषावार सॉर्टिंग करायला सांगितलं .

   पत्रं वाचताना उमजत गेलेले गांधी आणि ऐकलेले तथाकथित बुद्धीवाद्यानी व्याख्यानातून उलगडून दाखवलेले गांधी यात जमीन अस्मानांचं अंतर होतं .मनाशी नवीनच संघर्ष सुरु झाला .पत्रातून दिसणारे गांधी तसेच या माणसानी वर्णन केलेले गांधी म्हणजे एक महामिष्किल म्हातारा .ज्याची विनोदबुद्धी अफलातून आहे .लहानमुलांच्याही पत्राला त्यानी फार सुंदर उत्तर दिले होते .

   रेड्डी काकानी सांगितलेले दोन किस्से अफलातून आहेत .ते स्वतः शाळकरी वयाचे असताना आंध्रप्रदेशातून तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नसताना निव्वळ गांधीजींच्या जवळ राहायचे म्हणून त्याना पत्र पाठवून साबरमतीला रेल्वेने गेले .गांधीजीनी महादेवभाईना सांगितले होते या मुलाला तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः त्याला आणायला जा .महादेवभाईनी ते काम तिसऱ्याला सांगितले ..तिसऱ्याने चौथ्याला ..कुणीच या मुलाला आणायला गेला नाही .सकाळी आश्रमात येणारा हा मुलगा दुपारी एक वाजता पोहोचला .गांधीजींच्या लक्षात आले .काकाना जेवायला खायला देऊन विश्रांती घ्यायला सांगितली आणि महादेवभाईना शांत स्वरात एवढंच म्हणाले जर वल्लभभाई  किंवा जवाहरलाल येणार असता तर स्वतः जातीनं गेला असतात .हा मुलगा जवाहरलाल इतकाच मला महत्वाचा आहे. 

एकदा खेडा जिल्ह्यातून काही शेतकरी तहसीलदाराच्या जुलुम आणि वाढीव साऱ्याबद्दल तक्रार करायला आले होते.त्यातला एकजण दर दोन शब्दामागे संतापाने  शिव्या देत होता .महादेवभाई अस्वस्थ झाले.त्यानी लोकाना त्याला बाहेर घेऊन जायला सांगितले .पण बापूनी त्याला थांबवून पुन्हा बोलतं केलं.सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली .नंतर ते महादेवभाईना म्हणाले .त्याच्या शिव्या या त्याच्यावर झालेल्या अन्यायातून आल्या होत्या .ही साधी माणसं आहेत .त्याना संतापाच्या वेळी व्यक्तव्हायला उपयुक्त असणारे शब्द आहेत ते .तिथं भावना समजून घ्यायची असते .शब्दांचा कीस पाडत बसू नये.  

वल्लभभाईंची पत्नी अकाली गेली .त्यांची मुलगी ते गांधीजींच्याजवळ सोडून गेले.ती बापुंची खूप लाडकी होती .तिला रंगीत बांगड्या हव्या होत्या ,बापू रंगीत काचेच्या बांगड्या घालण्याच्या विरूद्ध होते .मोठ्या बायका रंगीत बांगड्या घालत नव्हत्या .पण त्या मुलीसाठी त्यानी रंगीत बांगड्या आणल्या .तेव्हा मोठ्या बायकानी याबद्दल विचारलं .ते म्हणाले तिच्या मनावर ताबा यायला काही काळ जावा लागेल . 

असे अनेक किस्से गांधीजींच्या बद्दल ऐकले .लहान मुलंही बापूंबरोबर भांडत असत .त्यांच्या सोबत फिरायला जात .चालण्याची शर्यत लावत .गांधीजींच्याजवळ  राहण्यासाठी आश्रमात विश्रांतीला गांधीवादी ,कम्युनिष्ट ,हिंदुत्ववादी ,दलित सर्वजण येत. गांधीजींबरोबर मनसोक्त भांडून ,वादावादी करून पुन्हा विश्रातीला येण्याची धमकी देऊन जात .असे होते गांधी .मी हल्ली गांधीविरोधातील लिखाण वाचून चिडत नाही .समर्थनार्थ युक्तीवादही करत नाही .कारण स्वतः गांधीजी जरी असते तरी त्यानीही बोळक्या दातातून मिष्किलपणे हसू सांडत म्हटलं असतं ,सचमुच मैं बहुत बुरा हूँ ...कुछ करना पडेगा ।
    स्वाती ठकार

No comments:

Post a Comment